तंबाखूमुक्त जीवन जगता येईल?

0

जागतिक आरोग्य संघटनेने ( थकज) तंबाखूला जागतिक समस्या म्हणून घोषित केले आहे. जगामध्ये प्रत्येक वर्षी तंबाखूच्या आजाराने पन्नास लक्ष लोक मरतात तर एकट्या भारतात दहा लक्ष लोक तंबाखूमुळे आपले जीवन गमावतात. तंबाखूच्या वापरामुळे हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार तसेच इतर असंसर्गजन्य रोग होतात. भारतामध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण जगाच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तंबाखू खाणार्‍यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आढळून येते. पुरुष मंडळी तर सोडाच त्याठिकाणी लहान मुले आणि स्त्रियासुद्धा तंबाखूच्या आहारी गेलेली दिसून येतात. विडी, सिगारेट, गुटखा, जर्दा, अशा विविध माध्यमातून व्यक्ती तंबाखूचा वापर करत असतो. ज्याप्रकारे चहा पिल्यामुळे मनाला तरतरी मिळते असे वाटते त्याच धर्तीवर तंबाखूच्या सेवनाने तरतरी मिळते, माइंड फ्रेश होते, बुद्धीला चालना मिळते, डोकं चालायला लागते असा काही लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरलेला आहे.

तंबाखू खाणारे मंडळी वरील कारणे सांगून तंबाखू खाण्याचे समर्थन करणारी वक्तव्य करतात. तंबाखू सेवनाने कर्करोग होतो किंवा नाही या विषयावर अजूनपर्यंत संशोधन झाले नाही किंवा हे खरच आहे असेही सांगता येत नाही. यावर मागील काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चा झाली आणि वाद-विवादसुद्धा झाले. तंबाखूचे समर्थन व्यक्त करणारी मंडळी तंबाखूसेवनाने काहीही होत नाही, कोणताच आजार होत नाही असे सांगतात. आमचे आजोबा तंबाखू खात होते. परंतु, ते वयाच्या ऐंशीव्या वर्षी नैसर्गिकपणे वारले. असे घरातील उदाहरण देऊन पटवून सांगतात. त्यास्तव कधीकधी अशा बोलण्यावर विश्‍वास टाकला जातो. परंतु, तंबाखू सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच गेले तर मात्र अति तेथे माती या म्हणीप्रमाणे आपल्या जीवनाचीसुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. म्हणून तंबाखू खाणे किंवा सिगारेट, बिडी पिण्याची सवय आपणास लागू नये याची प्रथम काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वास्तविक पाहता तंबाखूचे सेवन करणे ही वाईट सवय आहे. समाजामध्ये या सवयीला कोणीही चांगले म्हणणार नाही. कारण यामुळे चारचौघांत बसलेले असताना आपणास वारंवार बाजूला जावे लागते, थुंकावे लागते. बोलताना त्रास होतो, आपल्या थुंकण्याचा इतरांना त्रास होतो. म्हणून आपल्यापासून सर्वजण चार हात दूर राहणे चांगले असे ते समजतात. सिगारेट ओढणार्‍या व्यक्तीपेक्षा त्याच्या शेजारी असलेल्या लोकांना त्याचा जास्त त्रास होतो. जुन्या काळी विडी ओढणारे वृद्ध माणसे जास्त होती. पण हळूहळू त्यांची संख्या कमी झाली. मात्र, सिगारेट ओढणार्‍या युवकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, हे फारच चिंताजनक आहे.

तंबाखू खाण्याची सवय सहवासातून लागते. मित्रांच्या संगतीत राहून तंबाखूच्या आहारी गेलेली बरीचशी मंडळी भेटतात आणि अगदी हताशपणे बोलतात की ही सवय सुटणे फारच अवघड बाब आहे. खूप प्रयत्न करून पाहिला पण सवय काही तुटत नाही, राव असे एकांतात मित्रांशी बोलतात. जास्तीत जास्त मित्रांचा सहवास शाळा आणि महाविद्यालयाच्या काळात असतो आणि त्याच कालावधीत तंबाखू सेवनाची सवय लागण्याची दाट शक्यता असते. या शालेय वयात तंबाखू खाण्याची सवय मोठेपणी काही केल्या सोडवत नाही आणि जे या काळात तंबाखूपासून दूर राहतात त्यांच्या जीवनात तंबाखू कधीच प्रवेश करत नाही, असा बर्‍याच लोकांचा अनुभव आहे. म्हणूनच या शाळा-महाविद्यालयात मुलांना तंबाखूची सवय लागणार नाही याची काळजी मुख्याध्यापक, शाळा व संस्थेचे घटक आणि पालक या सर्वांनी घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे तंबाखू खाण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तंबाखूवर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तंबाखू वापरावर नियंत्रण आणण्याचे निर्देश दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी शैक्षणिक संस्थेसह सार्वजनिक ठिकाणी तंबाखूवरील बंदी सक्तीचे करण्यात आले आहे. लहान मुलांकडून तंबाखू विक्री करण्यास मनाई तर आहेच, शिवाय शालेय परिसरात 100 यार्डमध्ये तंबाखू विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा मोठ्या अक्षरात फलक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्याचे बंधनकारक केले आहे. या नियमाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीविरुद्ध दंडासह शिक्षापात्र गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. या नियमाची कठोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. मात्र तरीही शाळा कॉलेजच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकत मिळतात, हे खरोखरच चिंतनीय बाब आहे.

– नागोराव सा. येवतीकर
सामाजिक कार्यकर्ते ता. धर्माबाद
9423625769