मुंबई:दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी द्यायला नको होती. महाराष्ट्र सरकारने जशी तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, तशीच दिल्लीतही परवानगी नाकारायला हवी होती. दिल्लीत थोडी खबरदारी घेतली असती तर आज देशभरात वेगळे चित्र पाहायला मिळाले असते असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाबाबतच्या बातम्या वारंवार टिव्हीवर दाखवण्याची काय गरज आहे असा सवाल देखील शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी पुन्हा संवाद साधला. ते म्हणाले की, दिल्लीत खबरदारी घेतली असती तर वृत्तवाहिन्यांवरून एखाद्या वर्गाचे वारंवारे वेगळ चित्रे निर्माण केले गेले नसते. समाजाताली सर्व घटकांनी एकत्र राहण्याची गरज आहे. सोशल मीडियावरील मेसेज काळजी करण्यासारखे आहे. कारण पाचपैकी चार मेसेज खोटे असतात. पुन्हा पुन्हा हे मेसेज व्हायरल करून खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच यामागे कुणाचे षडयंत्र आहे का? याची शंका येते, असे देखील शरद पवरांनी यावेळी सांगितले. आर्थिक संकटांशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणी देखील शरद पवार यांनी केली आहे.