मुंबई । सत्तेत राहूनही शिवसेना सातत्याने फडणवीस यांच्या सरकारच्याविरोधात भूमिका घेत आहे. प्रसंगी सत्तेतून बाहेर पडण्याचे सूतोवाचही शिवसेनेकडून केले जात आहेत. मात्र शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तरी शिवसेनेतील 17 आमदार भाजपासोबच राहतील, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. एका दुरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणे यांनी हे वक्तव्य केले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास 2019 साली शिवसेनेच्या हातात फक्त काठी उरेल, झेंडा गायब झालेला असेल, असेही ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते सहभागी झालेल्या या यात्रेत संघर्षच दिसला नाही, असा टोला त्यांनी लगावला. कोकणातल्या संघर्षयात्रेचे नेतृत्व आपण करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या भाजपा प्रवेशाबाबत येत असलेल्या वृत्तावरही नारायण राणेंनी भाष्य केले. भाजपाकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर आहे. पण सध्या तिच्यावर विचार केलेला नाही, असे ते म्हणाले.