मुंबई | मुंब्रा इथल्या पारसिक बोगद्यावरील 200 झोपडपट्ट्यांवरून रेल्वे आणि ठाणे महापालिकेत जुंपली आहे. पारसिक बोगद्यात यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा भूस्खलन होण्याची भीती आहे. आणि जर भूस्खलनाची घटना घडलीच तर त्याला ठाणे महानगर पालिका जबाबदार असेल, असे मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मध्य रेल्वेने म्हटले आहे.
पारसिक बोगद्यात गेल्या वर्षी पावसाळ्यात जून महिन्यात भूस्खलन झाले होते. यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरची वाहतूक काही दिवस विस्कळीत झाली होती. याला कारण पारसिक बोगद्यावर असलेल्या झोपडपट्ट्या आहेत. पण त्यानंतरही वर्षभराच्या कालावधीत बोगद्यावरील झोपडपट्ट्या हटवण्यात आलेल्या नाहीत. पारसिकवरील या झोपडपट्ट्या न हटवण्याला ठाणे महानगर पालिका जबाबदार आहे, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. तर पारसिक बोगद्याचा परिसर हा आपल्या अखत्यारित येत नाही. हा भाग वन विभाग आणि रेल्वेच्या अंतर्गत येतो. तरीही आम्ही गेल्या वर्षी झोपडपट्टीवासियांना नोटीस बजावली होती, असे ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुंब्य्राच्या पारसिक बोगद्यावरील उदय नगर झोपडपट्टीवासियांना ठाणे महानगर पालिकेने झोपड्या हटवण्याची नोटीस बजावली होती. महापालिकेच्या या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर मध्य रेल्वेने एप्रिलमध्ये मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. पारसिक बोगद्यावरील धोकादायक झोपड्या कायमस्वरुपी हटवा अशी सूचना आम्ही ठाणे महापालिका प्रशासनाला केली होती. पण त्यावर अजून कुठलीही कारवाई झाली नाही. आणि सुरक्षा भिंतही उभारली नाही, असे मध्य रेल्वेकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पारसिक बोगद्याच्या बरोबर टोकावर 100 हून अधिक झोपड्या आहेत. गेल्या 60 वर्षांपासून या झोपड्या आहेत. पण या झोपड्यांमुळे रेल्वेने बांधलेल्या नाल्यांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात हे नाले तुंबून दरवर्षी भूस्खलनाची भीती असते. पण आमच्या पुनर्वसनाची कुठलीही पर्यायी व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे इथून जाणं आम्हाला शक्य नाही, असे इथल्या झोपडपट्टीवासियांचे म्हणणे आहे.