पुणे । शिवसेनेने पाठिंबा काढला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी गुरुवारी दिला. शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर विरोधी आमदारांची संख्या दीडशेपर्यंत पोहोचेल, असा दावा करत अजित पवार यांनी फडणवीस सरकारला पाठिंबा न देण्याचे संकेतही दिले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बारामती तालुक्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ बारामती तालुक्यातील कण्हेरमध्ये अजित पवार यांच्या हस्ते झाला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यावेळी उपस्थित होते.
भाजपच्या डोक्यात हवा
सरकार नोटीस पिरियडवर आहे, असे सांगत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. अजित पवार यांनी हाच धागा पकडून अजित पवार यांनी भाजपच्या डोक्यात सत्ता गेली असून, सर्वच मित्रपक्ष भाजपवर नाराज आहेत. सरकारमध्ये सहभागी झालेल्या शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे तेही नाराज आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीनंतर सरकार राहील की नाही, याबाबत संभ्रम आहे. सध्याच्या घडीला शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास फडणवीस सरकार कोसळेल, असा इशारा त्यांनी दिला.
आमदार विरोधात जातील
शिवसेनेने सरकारचा पाठिंबा मागे घेतल्यास सरकारकडे फक्त 138 आमदार राहतील. अशा स्थितीत सरकार कसे टिकेल, असा प्रश्न अजित पवार यांनी केला तसेच, विरोधी पक्षांचे दीडशेच्या आसपास आमदार त्यांच्याविरोधात जातील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षासह इतर डावे पक्ष भाजप आणि शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांना कधीच पाठिंबा देणार नाहीत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही, असे सूचित केले.