…तर भाजपात प्रवेश करू; कृषी विधेयकावरून बच्चू कडूंचे वक्तव्य

0

मुंबई: केंद्र सरकारने मागील महिन्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कृषी विषयक विधेयकांना मंजुरी दिली आहे. या विधेयकाला काही शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील या विधेयकाची अंमलबजावणी राज्यात होणार नाही असे जाहीर केले आहे. दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना आता राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनी देखील विरोध केला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या वृत्तानुसार मंत्री बच्चू कडू यांनी कृषी विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात करायला आम्ही तयार आहोत फक्त मोदींनी दोन ओळी यात टाकाव्यात. शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ व याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असे कृषी विधेयकांमध्ये नरेंद्र मोदींनी नमूद करावे, त्यांनी तसे केले तर आम्ही भाजपात प्रवेश करु, असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.

कृषी सुधारणा विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. शेतकऱ्यांना ते योग्य वाटत नाही. अनेक शेतकरी संघटनांनी याला विरोध केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य अनेक राजकीय पक्षांचा देखील विरोध केला आहे. ही विधेयक लागू करण्यासाठी ऐवढी घाई कशासाठी, असे सांगत अजित पवार यांनी कृषी आणि कामगार विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करण्यास आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.

कृषी क्षेत्राशी संबंधित, शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, २०२० आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) दर हमी विधेयक २०२०, ही दोन विधेयके आवाजी मतदानाने राज्यसभेत देखील मंजूर करण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना, हा भारतीय कृषी इतिहासातील महत्वाचा दिवस असल्याचे म्हटले आहे. तसेच एमएसपी व्यवस्था सुरूच राहील, असे आश्वासनही नरेंद्र मोदींनी दिले आहे. तसेच अनेक दशकांपासून आपले शेतकरी बांधव, अनेक प्रकारच्या बंधनांत अडकले होते आणि त्यांना दलालांचा समना करावा लागत होता. आता ही विधेयके संसदेत मंजूर झाल्याने, या सर्वांतून शेतकऱ्यांची मुक्ती झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांना बळकटी येईल आणि त्यांची समृद्धी निश्चित होईल,” असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.