…तर मग रेशनही फुकट द्या: उद्धव ठाकरेचा खोचक टोमणा

0

मुंबई: डिजिटल इंडिया करून लोकांची पोटं भरणार नाहीत. केवळ फोनवर दाखवण्यासाठी नव्हे तर ताटात सुद्धा असायला हवं. इंटरनेट फुकट देत आहात तर मग रेशनही फुकट द्या, असा खोचक सल्ला आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिलायन्स कंपनीचं नाव न घेता दिला. ते मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या केबल मालक संघटनांच्या कार्यक्रमात बोलत होते.

जिओ फायबर विरोधात केबल संघटनांनी एल्गार पुकारला असून जिओची यात मक्तेदारी नको अशी मागणी केबल मालकांनी केली आहे. प्रत्येक गोष्ट लढा देवून मिळवायची आमची तयारी आहे. केबल मालक संघटनांना बळ मिळावे म्हणून या ठिकाणी आलो आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जिओ फायबरमुळे केबलचालकांना अस्वस्थ वाटणे सहाजिक आहे. केबल चालकांनी कष्ट करून व्यवसाय उभे केले आहेत. ते असे उद्ध्वस्त होऊ देणार नाही.

इंटरनेट सारख्या सेवा पहिल्यांदा फुकट वाटायच्या, काही महिन्यांत प्रतिस्पर्धी नामोहरम होऊन संपले की नंतर अव्वाच्या सव्वा दर वाढवायचे. मोफत द्यायचे असेल ५० वर्षांचा करार करून मोफत सेवा वाटा, असं उद्धव यावेळी म्हणाले. केवळ मोबाईलवर दाखवून पोट भरणार आहे का?, ताटात काहीच नसेल तर अशा डिजिटल इंडियाचा काय उपयोग?. कोणाला व्यवसाय करण्यास आमचा विरोध नाही. आणखी १० जणांनी या व्यवसायात यावे पण कोणाच्या पोटावर पाय आणू नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.