मुंबई: येत्या ५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे. तत्पूर्वी अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. भूमिपूजनाला कोण-कोण? उपस्थित राहणार याबाबत चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भूमिपूजनाचे निमंत्रण देण्यात आलेले नसल्याने ते उपस्थित राहणार कि नाही? याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे, मोदी भूमिपूजनाला जात आहेत, त्यांच्यासोबत आमच्या शुभेच्छा आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला निमंत्रण मिळाले किंवा नाही मिळाले? हा विषय महत्त्वाचा नसून कोरोनामुळे स्थिती गंभीर असल्याने अयोध्येला जाणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. आता कोरोनामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अयोध्येला जाणे कठीण आहे, परंतु ते नक्कीच जातील असेही राऊत यांनी सांगितले.
लालकृष्ण अडवाणी, डॉ.मुरली मनोहर जोशी यांना देखील निमंत्रण मिळाले नाही. उमा भारती यांना निमंत्रण आहे मात्र त्याही कोरोनामुळे त्याठिकाणी जाणार नाहीत असेही राऊत यांनी सांगितले.
राम जन्मभूमीसाठी शिवसेनेचे योगदान मोठे आहे. हे भाजप, विहिप आणि संघ परिवार देखील नाकारत नाहीत. बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेची भूमिका मोठी आहे. जर बाबरी मशीद पाडले नसते तर आज राम मंदिराचा विषयच राहिला नसता. आम्ही राम मंदिराचा रस्ता तयार केला आहे. मोदी भूमिपूजन करणार आहेत, त्यांच्यासोबत आमच्या सदिच्छा आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला टोलाही लगावला.