तामिळनाडू राज्यातून नंदुरबारवासी सुखरूप घरी परतणार

0

नवापूर: तामिळनाडू राज्यातून नंदुरबारवासी सुखरूप घरी परतणार आहे. यासाठी डॉ.उल्हास वसावे, बिटीपीचे के. टी. गावित यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात नैसर्गिक संपत्ती जरी मुबलक असली तरी राजकीय अनास्थेमुळे या जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या बांधवांचा विकास अतिशय धीम्या गतीने होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ व दरवर्षी भरमसाठ बजेट मिळून देखील या जिल्ह्यात नवापूरची औद्योगिक वसाहत सोडली तर तरुणांना रोजगारासाठी दुसरा मार्ग नाही. आदिवासी समाजाच्या नावावर विकासाच्या कितीही गप्पा मारल्या किंवा कागदे दाखवली तरी कोरोनारूपी सैतानाने गरीब जनतेचे भारतीय चित्र मात्र उघडे केले आहे.

लॉकडाउन जाहीर झाले व नंदुरबार जिल्ह्यातील लोक कोण कुठे अडकले याबाबतचे व्हिडीओ व मेसेजेस समाज माध्यमावर वायरल होऊ लागले. रोजगार व उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन जिह्यात उपलब्ध नाही म्हणून नंदुरबारची जनता फक्त गुजरातच नाही तर भारताच्या इतर राज्यात देखील कामासाठी गेलेली आहे. लॉकडाउनमध्ये अडकलो आहोत. आम्हाला गावी परत यायचे आहे.. अन्न-धान्य नाही.. आम्हाला मदत करा …” अशा प्रकारचे बरेच व्हिडीओ समाज-माध्यमावर आले. कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत डॉ. उल्हास वसावे किंवा के. टी. गावित यांना फोन येतात. या काळात ज्या-ज्या व्यक्तींचे फोन आले त्या प्रत्येकाला शक्य त्या परीने मदत करण्याचा प्रयत्न डॉ. उल्हास वसावे किंवा के. टी. गावित हे करीत आहे.

आरामदायी खासगी बस नवापुरच्या दिशेने रवाना

असाच एक फोन डॉ. उल्हास वसावे यांना आला. सर मी वर्षा बोलत आहे… मी नवापूर तालुक्यातील आहे. सध्या तामिळनाडू राज्यात इरोडजवळ पेरूंदुराई येथे कंपनीत कामाला आहे. आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या २० मुली येथे आहोत आणि कंपनी सध्या बंद आहे. आम्हाला घरी यायचे आहे.आम्हाला मदत करा…
डॉ. उल्हास वसावे यांनी तात्काळ तामिळनाडू राज्याच्या प्रशासनाशी संपर्क केला. नजीकच्या पोलीस ठाण्याचे डी.एस.पी. राजकुमार यांनी त्या सर्व मुलींची त्यांच्या वसतिगृहात जाऊन भेट घेतली व सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ज्या दिवशी डॉ. उल्हास यांना फोन आला, त्या दिवसापासून डॉ. उल्हास वसावे, के. टी. गावित व त्यांचे तामिळनाडू राज्यातील सहकारी सतत या सर्व मुलींच्या व इतर लोकांच्या संपर्कात होते. आज सर्व प्रयत्न सफल झाले. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व मुली व काही मुले पेरूंदुराई (इरोड) येथून एका आरामदायी खासगी बसने नवापुरच्या दिशेने रवाना झाल्याचे इरोड येथील प्रतिनिधींनी कळविले आहे.

पेरूंदुराई येथील जे. जे. मिल्सचे जॉन अँथोनी (ए.जी.एम – एच. आर), वझीर कंपनीचे स्थानिक व्यवस्थापक महेश तसेच मुलींच्या वसतिगृहाच्या वॉर्डन श्रीमती अमिया व श्रीमती धनकुमारी यांनी आपल्या सर्व मुलींना आनंदाश्रूसह रवाना केले. या सर्व मुली सुखरूप आपल्या घरी पोहचाव्या याकरिता थ्री-वेज मीडियाचे मदत करणाऱ्या सर्व समाजसेवकांना धन्यवाद करण्यात येत आहे.