तितूर नदीपात्रात बुडाल्याने शेंदुर्णीच्या तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव : तालुक्यातील वाघळी येथील स्मशानभूमी मागील पाण्याच्या केटीवेअरमध्ये बुडाल्याने शेंदुर्णी येथील भाविक तरुणाचा मृत्यू झाला. सुनील रामदास गुरव (18, रा.शेंदुर्णी, पहुर) या तरुणाचा मृत्यू झाला. नवरात्रोत्सवात ज्येात आणण्याची परंपरा असून शेंदुर्णी येथील रेणुका माता मित्र मंडळातील दहा ते बारा तरुण हे सप्तशृंगी गडावर 4 रोजी सायंकाळी सहा वाजता पायी निघाले होते तर काही दुचाकी गेले. परतीच्या प्रवासात सुनील रामदास गुरुव व त्याचे मामा गणेश गुरव हे देखील तितूर नदीवरील केटीवेअर हातपाय धुण्यासाठी गेले असता सुनील गुरवचा पाय सरकून तो पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावेळी मामासह इतराने शर्थीचे प्रयत्न केले मात्र तरुणाला वाचवण्यात यश आले नाही. मयत सुनील रामदास गुरवच्या पश्चात मोठा भाऊ, आई व वडील असा परीवार. घटनास्थळी मंडळाच्या तरुणांनी मोठा आक्रोश केला. ही घटना परीसरात वार्‍यासारखी पसरताच घटनास्थळी पोलिस प्रशासन व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्यांनी धाव घेतली.