‘तिहेरी तलाक’वर जे मौन बाळगतात तेही गुन्हेगार

0

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समान नागरी कायद्यावर भर देत ‘तोंडी तलाक’च्या मुद्यावर काही जणांनी पाळलेले मौन पाहून आश्‍चर्य होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभावेळी आदित्यनाथ यांनी हे मत व्यक्त केले. तोंडी तलाकविरुद्ध प्रत्येकाने भूमिका घेणे आवश्यक आहे. चंद्रशेखरसुद्धा समान नागरी कायद्याच्या बाजूनेच होते. तोंडी तलाकच्या मुद्यासंदर्भात मौन पाळणारेही दोषीच आहेत, अशी टीका आदित्यनाथ यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाकडून सध्या ‘तोंडी तलाक’च्या प्रथेची घटनात्मक वैधता तपासण्यात येत आहे. केंद्र सरकार व काही स्वयंसेवी संस्थांकडून तोंडी तलाकची ही प्रथा लैंगिक समानतेच्या विरोधात असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या या भूमिकेस ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने व इतर काही महत्त्वपूर्ण मुस्लीम मौलवींनी ठाम विरोध दर्शविला आहे. तोंडी तलाकला मुस्लीमांचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणची मान्यता असून, यामुळे हा विषय न्यायालयाच्या मर्यादेमध्ये येत नाही.

तोंडी तलाक घटनात्मकदृष्ट्या अवैध ठरविणे म्हणजे कुराणचे पुनर्लेखन केल्यासारखे असल्याचा इशारावजा दावाही मुस्लीम बोर्डाने केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आदित्यनाथ यांच्या विधानांना महत्त्व दिले जात आहे. आपला देश एक आहे. मग या देशात समान नागरी का नसावा? असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, तिहेरी तलाकमुळे मुस्लीम महिलांची कुचंबणा होत असून, त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळेच समान नागरी कायदा महत्त्वाचा आहे. समान नागरी कायद्यासाठी चंद्रशेखरही अनुकूल होते, असा दावाही आदित्यनाथ यांनी केला आहे.

समान नागरी कायद्याचे समर्थन
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समान नागरी कायद्याचे समर्थन करीत ‘देश एक आहे तर समान नागरी कायदा का नाही?’, असा प्रश्‍न उपस्थित केला. देश एक आहे तर मग लग्नाबाबतचे नियमही समान का नसावेत? असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘तिहेरी तलाक’चा मुद्दाही उपस्थित केला आहे.

महाभारतातील द्रौपदीचे उदाहरण
देशातील समस्यांवर काही लोकांचे तोंड बंद असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. यावेळी त्यांनी महाभारतात द्रौपदीच्या वस्त्रहरणवेळी उपस्थित लोकांनी स्वीकारलेल्या मौनाचे उदाहरण देत तिहेरी तलाकवर ज्यांचे मौन आहे, ते एखाद्या गुन्हेगारासारखेच आहेत, अशी टीका त्यांनी केली. तिहेरी तलाक ही खूप मोठी समस्या असून यामुळे महिलांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले.