केडगाव : धोकादायक बाह्यवळण मागार्मुळे जडवाहतूक थेट शहरातून घुसत असल्याने आत्तापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. आज देखील केडगावमध्ये अवघ्या तीन तासात दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान बाह्यवळण दुरुस्तीसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आल्याने आजपासून जडवाहतूक शहरातून बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला.
आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील कल्याण विठोबा अनभुले (वय ६१) यांना केडगाव वेशीसमोर जड वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेला तीन तास उलटत नाहीत तोच सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अनामिका अविनाश गायकवाड (वय २१) या तरुणीला अंबिकानगर बसस्थानका शेजारी जड वाहनाने चिरडले त्यात ती जागेवरच ठार झाली. दरम्यान हि घटना घडल्यानंतर केडगाव मधील जमाव घटनास्थळी जमा झाला. दरम्यान पहाटे अपघातात मरण पावलेले अनभुले सेवानिवृत्त बांधकाम विभागातील कर्मचारी होते.तर अनामिका हि पुण्यात केंद्रीय विद्यालयात शिकत होती. ती नगरमध्ये क्लाससाठी चालली होती.
सर्वपक्षीय रास्तारोको
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगर-पुणे मार्गावर ठिय्या देत रास्ता रोको सुरु केला. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्ण ठप्प झाली. जोपर्यंत जडवाहतूक शहरातून बंद होत नाही. तोपर्यंत आम्ही जागेवरून उठणार नसल्याने आंदोलन चिघळले. संतप्त नागरिक यात सहभागी झाले. अखेर कोतवालीचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे व वाहतूक निरीक्षक अविनाश मोरे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन त्यांशी चर्चा केली. मात्र जोपर्यंत बाह्यवळण रस्ता सुरु होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. यानंतर पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी मोबाईलवर चर्चा करण्यात आली. आजपासून शहर हद्दीतून जडवाहतूक वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात नगरसेवक दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अंबादास गारुडकर, शिवाजी लोंढे, संजय लोंढे, मनोज कोतकर ,भूषण गुंड, अमोल येवले, हर्षवर्धन कोतकर,विजय पठारे आदी सहभागी झाले होते.
उद्या सर्वपक्षीय बैठक
बाह्यवळण खराब असल्याने सर्व जड वाहतूक शहरातून वाहतूक करते. यामुळे अलीकडे अपघातांची संख्या वाढली आहे. जोपर्यंत बाह्यवळण मार्ग वाहतुकीस खुला होत नाही तोपर्यंत असे अपघात होतच राहणार. यामुळे हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले.