तीन हजार डीएड, बीएड महाविद्यालये बोगस?

0

नवी दिल्ली : देशातील सुमारे तीन हजार शिक्षणशास्त्र अध्यापन पदविका महाविद्यालये (डीएड) आणि अध्यापक पदवी महाविद्यालयांवर (बीएड) महाविद्यालये नुसती कागदावरच आहेत, सरकारला माहिती देण्यासारखी कोणतेच कागदपत्रे या महाविद्यालयांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अशा महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचे संकेत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. यामुळे बेकायदा महाविद्यालये सुरू करून पैसा कमावणार्‍यांना चांगलाच आळा बसणार आहे.

सद्या साफसफाई मोहीम हाती घेतली आहे : जावडेकर
याबाबत माहिती देताना जावडेकर म्हणाले, की देशभरातील अशा बनावट डीएड, बीएड महाविद्यालयांनी एक प्रकारे धंदाच सुरू केला आहे. त्यामुळे या संपूर्ण क्षेत्राचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घ्यावी लागली आहे. त्यादृष्टीने आम्ही या डीएड आणि बीएड महाविद्यालयांकडून सविस्तर माहिती असलेले प्रतिज्ञापत्र मागितले. त्यासाठी वारंवार स्मरणपत्रे पाठवली. परंतु, सुमारे तीन हजार महाविद्यालयांनी ते सादरच केले नाही. कारण त्यांच्याकडे दाखवण्यासारखे, माहिती देण्यासारखे काहीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे ही सर्व महाविद्यालये बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. ती केवळ कागदोपत्री अस्तित्वात आहेत. तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कदाचित त्यांची मान्यता रद्द केली जाईल, असे जावडेकर म्हणाले. ही महाविद्यालये धड अभ्यासक्रम नीट पूर्ण करीत नाहीत, भावी शिक्षकांनाच शिकवण्याची कला शिकवत नाहीत, तरीही पदव्या वाटतात. ही लुटमार थांबवण्यासाठी आम्ही शिक्षकांच्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करीत आहोत. म्हणून पहिल्यांदा साफसफाई झाल्याशिवाय यंदा नव्या महाविद्यालयांना मान्यता दिलेली नाही, असेही जावडेकर यांनी सांगितले.

सहा महिन्यांत नवे शैक्षणिक धोरण
सर्वांना उत्सुकता असलेले नवे शैक्षणिक धोरण लवकरच लागू करणार असल्याचे जावडेकरांनी स्पष्ट केले. मे महिनाअखेर एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली जाईल, त्यानंतर पुढील पाच ते सहा महिन्यांमध्ये शैक्षणिक धोरणाला अंतिम स्वरूप दिले जाईल, असेही मंत्री जावडेकर म्हणाले. इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या (नो डिटेन्शन) धोरणात फेरबदल करण्याचा निर्णय निश्‍चित झाला असून, पावसाळी अधिवेशनात विधेयक मंजूर झाल्यास तो पुढील वर्षीपासून लागू होऊ शकतो. त्यानुसार केवळ इयत्ता पाचवी आणि आठवीमध्येच दोनदा (मार्च व जूनमध्ये) परीक्षा घेतली जाईल. दोन्ही वेळेला अनुत्तीर्ण झाल्यास त्या विद्यार्थ्यांला पुढील वर्गात पाठवले जाणार नसल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.