तुरीचा शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी सुरूच राहणार! लबाड व्यापार्‍यांना सोडणार नाही!

0

नागपूर : तूर खरेदी घोटाळ्यात शेतकर्‍यांच्या नावाने फायदा उठवणार्‍यांना अजिबात सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी घोटाळेबाज व्यापार्‍यांना दिला आहे. अशा व्यापार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

राज्य सरकारच्या महावेध प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या स्वयंचलीत हवामान केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंगरगांव इथे उद्घाटन केले. यावेळी उन्नत शेती – समृध्द शेतकरी मोहीमेच्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.
राज्यात तुरीच्या केंद्रांवर व्यापार्‍यांचा सुळसुळाट आहे आणि त्याचा फटका शेतकर्‍यांना बसतो आहे. याची सखोल चौकशी करण्यात येत असून प्रथमदर्शनी या तूर खरेदीत 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे दिसून येत असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शेतकर्‍यांच्या नावाने सरकारची फसवणूक करून स्वत:ची तूर खपवणार्‍यांना सोडणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या 15 वर्षात सरकारने जेवढी तूर खरेदी केली, त्यापेक्षा जास्त तूर यंदा एका वर्षात सरकारने केली आहे. यंदा राज्यात जलयुक्त शिवार योजना राबवल्याने तुरीचे विक्रमी 20 लाख टन उत्पादन झाले. त्यापैकी 5 लाख टन तूर सरकारने खरेदी केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एकीकडे तूर खरेदी केल्याचा दावा करत असताना दुसरीकडे आठव्या दिवशीही राज्यात तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. रविवार असूनही अकोला, परभणी, बुलढाणा, यवतमाळ या चार ठिकाणी तूर खरेदी सुरू आहे. तर लातूर आणि वर्ध्यात अजूनही पंचनामेच सुरू आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना सलग आठव्या दिवशीही तूर खरेदीसाठी रांगेत ताटकळत उभे लागले आहे.