मुंबई : भारतातील पहिली सेमी – हायस्पीड ‘तेसज एक्स्प्रेस’ २०१७ साली मुंबई – गोवा दरम्यान सुरु करण्यात आली. या रेल्वेमध्ये प्रवाशांना विशेष सुविधा देण्यात आल्या होत्या. ज्यात वायफाय, सीसीटीव्ही, चहा – कॉफीसह एलसीडी स्क्रीन, हेडफोन उपलब्ध करुन देण्यात आले होते. मात्र काही चोरांनी रेल्वेने पुरवलेले २०० रुपये किंमतीचे हेडफोन बदलून त्याजागी हलक्या आणि अगदी कमी किंमतीचे हेडफोन तिथे लावून ठेवल्याचे समोर आले आहे. तसेच बऱ्याच एलइडी स्क्रीनची देखील मोडतोड करण्यात आली होती. त्यामुळे आता ‘तेजस एक्सप्रेस’मधील एलसीडी स्क्रीन काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘तेजस एक्सप्रेस’मध्ये प्रवाशांचा प्रवास आनंददायी व्हावा यासाठी विमान सेवेप्रमाणे एलसीडी स्क्रीन बसवण्यात आल्या होत्या. या स्क्रीनवर प्रवासी प्रवास करताना चित्रपट पाहू शकत होते. ज्या व्यक्तींना गाण्याची आवड आहे, त्या व्यक्ती गाणी देखील ऐकू शकत होत्या. लहान मुले गेम देखील खेळू शकत होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून एलसीडी स्क्रीनची तोडफोड केली जात असल्याची माहिती समोर आली. तसेच एलसीडी स्क्रीनची देखील चोरी होत असल्याने ‘तेजस एक्सप्रेस’मधील एलसीडी स्क्रीन काढून टाकण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.