कल्याण । कल्याणनजीक मोहने येथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत अनेकदा महावितरणकडे तक्रारी करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने मनसेच्या नगरसेविका सुनंदा कोट आणि विभागप्रमुख राहुल कोट यांनी महावितरणच्या अधिकार्यांची भेट घेत जाब विचारला. यावेळी बिल नियमित भरणार्या ग्राहकांना त्रास का दिला जातेय, असा सवाल करत या समस्येवर तोडगा काढा अन्यथा नागरिकांना वीज बिल न भरण्याचे आवाहन करू असा इशारा दिला. कल्याण पश्चिमेहून नजीक असलेल्या मोहने येथे गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरात 10 ते 15 वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महावितरण कार्यालयात तक्रारी केल्या असता कार्यालयातून फिडर ट्रिप होत असल्याचे तसेच पॉवर हाऊस सब स्टेशनमध्ये बिघाड असल्याची उत्तरे देण्यात येते. मात्र या समस्येबाबत मनसे नगरसेविका सुनंदा कोट यांनी महावितरणकडे पाठपुरावा करत या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली.
आंदोलनाचा इशारा
मोहने येथे गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरात 10 ते 15 वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणने काहीच कार्यवाही न केल्याने अखेर मनसे नगरसेविका अ प्रभाग क्षेत्र सभापती सुनंदा कोट आणि विभागप्रमुख राहुल कोट यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र यादव यांची भेट घेत वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा मागणी करून महावितरण काहीच कारवाई करत नसल्याने या समस्येवर तत्काळ तोडगा न काढल्यास महावितरणविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच नागरिकांना वीज बिल न भरण्याचे आवाहन करू असा इशारा दिला आहे.