त्यांना टीकेचा; मला देशसेवेचा ध्यास!

0

नवी दिल्ली : व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने प्रगती केल्याचे जागतिक बँकेने अहवालात स्पष्ट केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेवरून टीका करणार्‍या विरोधकांवर या अहवालाचा दाखला देत टीकास्त्र डागले. आम्ही केलेल्या विस्मयकारक कामाची जागतिक बँकेने योग्य ती दखल घेतली ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. मात्र, काहीजण फक्त टीकाच करतात. त्याना टीकेचा, तर मला फक्त देशसेवेचा ध्यास आहे, असे मोदी म्हणाले. ते शनिवारी दिल्लीतील प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

जागतिक बँकेची इमारतही पाहिली नाही
पंतप्रधान मोदी म्हणाले, काही जणांना व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने 142 व्या स्थानावरून 100 व्या स्थानापर्यंत प्रगती केली, याचाशी काहीच देणेघेणे नाही. त्यांना स्वत:लाही काही करायचे नाही. जे करत आहेत त्यांना प्रश्न विचारायचे काम ते करत आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये ज्यांनी यापूर्वी जागतिक बँकेसाठी काम केलेले आहे, अशांचाही समावेश आहे. मी असा पंतप्रधान आहे की, ज्याने अजूनही जागतिक बँकेची इमारतही बघितलेली नाही. मात्र, यापूर्वी जागतिक बँकेत काम केलेल्या काही लोकांनी पंतप्रधानपद भूषविले होते. तरीही हेच लोक जागतिक बँकेने भारताच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊनही प्रश्न उपस्थित करत असल्याचे मोदी म्हणाले.

भारताने झेप घेतली
माझ्याकडे दुसरे काम तरी काय आहे? माझा देश, येथील सव्वाशेकोटी जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणे हेच माझे एकमेव ध्येय आहे. जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता निर्देशंकात भारताने जी झेप घेतली आहे, ती कामगिरी यापूर्वीच करता येणे शक्य होते. भारताची आजची परिस्थिती अजून चांगली झाली असती. यापूर्वी दिवाळखोरी आणि बुडीत कर्जासंबंधी नियमांमध्ये योग्य सुधारणा झाली असती तर हे भाग्य तुमच्याच वाट्याला आले नसते का?, असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. त्यामुळे आता जागतिक बँकेच्या अहवालावरून आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा आपण सगळ्यांनी देशाच्या विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत, असे मोदी म्हणाले.

यंदा 10 देशांमध्येही भारताचे स्थान
जागतिक बँकेतर्फे जाहीर करण्यात येणार्‍या व्यवसाय करण्यासाठी सुलभता निर्देशांकाच्या 190 देशांच्या यादीत भारताने यंदा शंभरावे स्थान पटकावले आहे. गतवर्षीच्या भारताच्या मानांकनात यंदा 30 अंकांनी सुधारणा झाली आहे. तसेच आपल्या मानांकनात सुधारणा साधणार्‍या सर्वोत्तम 10 देशांमध्येही यंदा भारताने स्थान पटकावले आहे. हा निर्देशांक व मानांकन ठरवताना भारतातील मुंबई व दिल्ली या दोन शहरातील परिस्थिती प्रामुख्याने लक्षात घेण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीत मुंबईचे स्थान पुन्हा अधोरेखित झाले आहे.