मुंबई । भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची पुढील महिन्यात होणार्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी भारताच्या 19 वर्षाखालील संघात निवड झाली आहे. 18 वर्षीय डावखुरा गोलंदाज अर्जुन गेल्या वर्षी कूच बिहार ट्रॉफीमध्ये मुंबईच्या 19 वर्षाखालील संघाकडून खेळला होता यात त्याने 18 विकेट मिळवल्या होत्या. ज्युनियर निवड समितीने येथे झालेल्या बैठकीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांसाठी अर्जुनची संघात निवड केली. दरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांसाठी त्याला संघात निवडण्यात आलेले नाही. भारतीय संघ श्रीलंकेत 11 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान दोन मालिका खेळणार आहे. अर्जुनच्या निवडीवर सचिन म्हणाला, अर्जुनची संघातील निवड ही त्याच्या करिअरमधील माईलस्टोन ठरणार आहे. अंजली आणि मी नेहमीच अर्जुनच्या निवडीसाठी पाठिंबा देऊ आणि त्याच्या यशासाठी प्रार्थना करु.
अर्जुनला अनेकदा भारतीय आणि दुसर्या संघांसोबत नेट प्रॅक्टिस करताना पाहिले गेले आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीही त्याची गोलंदाजी पाहिली आहे. गेल्या वर्षी अर्जुनने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेआधी वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाच्या सरावात सहभाग घेतला होता. जेव्हा लॉर्ड्सवर अर्जुन इंग्लंडच्या संघासोबत नेट प्रॅक्टिस करत होता तेव्हाही त्याच्या नावाची चर्चा होती.
प्रशिक्षकांनीही केले अर्जुनचे कौतुक
सचिनच्या विधानाव्यतिरिक्त मुंबईच्या 19 वर्षाखालील संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक सतीश सामंत यांनीही अर्जुनचे कौतुक केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेलल्या मुलाखतीनुसार सामंतच्या मते अर्जुनने या मोसमामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. अर्जुनमध्ये बरेच काही करण्याची क्षमता आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांत अर्जुनच्या गोलंदाजीमध्ये सुधारणा झाली आहे. त्याच्या गोलंदाजीची लय सुधारली आहे.