‘त्या’ विधानावरून कॉंग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांचे यूटर्न

0

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर निकालावर चर्चा सुरु आहे. लोकसभा निकालांमध्ये भाजपाला बहुमत मिळाले नाही तर विरोधी पक्षांची एकजूट करुन पंतप्रधानपदावर दावा केला जाऊ शकतो. काँग्रेसने इतर पक्षाचा पंतप्रधान झाला तरी चालेल, एनडीए हटवणे आमचे लक्ष्य असल्याचे विधान काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांनी केले होते. या विधानावरून आता काँग्रेसने घुमजाव केले आहे. काँग्रेसने पंतप्रधानपदासाठी इतर पक्षाला पाठिंबा देईल असे कधीही सांगितले नाही. काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा आणि जुना राजकीय पक्ष आहे. जर पाच वर्षे सरकार चालवायचे असेल तर काँग्रेसला संधी दिली पाहिजे असे विधान करत काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांनी यूटर्न घेतले आहे.

लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, या शक्यतेमुळे मतमोजणीच्या दिवशी, २३ मे रोजी सोनिया गांधी यांनी भाजपबरोबर नसलेल्या आणि त्याचबरोबर यूपीएचे घटक असलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. निवडणूक निकालांपूर्वीच ही मोर्चेबांधणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. या बैठकीत पंतप्रधानपदाबाबत चर्चा केली जाईल.

मागील आठवड्यातही कपिल सिब्बल यांनीही काँग्रेसला 272 जागा जिंकता येणार नाहीत, हे आम्हाला माहित आहे. तसेच, भाजपालाही 160 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. पण, काँग्रेस प्रणित आघाडीचेच सरकार येईल असं विधान केलं होतं. त्यामुळे 23 मे रोजी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होईल, असेही सिब्बल यांनी म्हटलं होतं. तर शरद पवार यांनीही मोदींचं सरकार फक्त 13 दिवस टिकेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी मोदींना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं तरी त्या सरकारची अवस्था 1996मधल्या वाजपेयी सरकारसारखीच होईल, असं सांगितलं आहे. भाजपाविरोधात सर्व पक्षांना एकत्र आणण्याचं काम सुरू आहे. 21 मे रोजी त्याला मूर्त स्वरूप येणार असल्याचंही पवार यांनी सांगितले आहे.