‘त्या’ शिफारस करणार्‍या खेळाडूंवर कारवाई व्हावी – अखिल कुमार

0

नवी दिल्ली। द्रोणाचार्य पुरस्कारासाठी ब-याच प्रशिक्षकांच्या नावाची शिफारस करणार्‍या खेळाडूंवर कारवाई व्हावी, असे मत ऑलिम्पियन तसेच स्टार बॉक्सर अखिल कुमार याने व्यक्त केले. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार असलेले अर्जुन, द्रोणाचार्य आणि राजीव गांधी खेलरत्न हे बर्‍याच वर्षांपासून वादात अडकले आहेत.

राष्ट्रकूल स्पर्धेचा कांस्यपदक विजेत्या अखिल याने या प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्याचे आवाहन केले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला, ‘व्यवस्थेला स्वच्छ करण्यासाठी दोन उपाय आहेत. नम्रतेने प्रयत्न करू शकता किंवा हे यशस्वी ठरत नसेल तर दंडात्मक कारवाई करू शकता. निलंबनाची व्यवस्था असेल तर त्याचा अधिक परिणाम दिसून येईल. एक खेळाडू द्रोणाचार्य पुरस्कारासाठी एकाहून जास्त प्रशिक्षकांची शिफारस करतात हे ऐकून मला आश्चर्य वाटते. गुरु हा एकच असतो. असे प्रकार करणार्‍यांवर कारवाई व्हावी.’ अखिलने यासंदर्भात एका महिला मुष्ठियोद्ध्याचे उदाहरण दिले.