थंडी आणखी तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज

0

तापमानाचा पारा 5 ते 9 अंश सेल्सिअसपर्रंत खाली उतरला

अतिथंड वाऱ्यामुळे राज्याच्या सर्वच भागातील किमान तापमानात घट

नाशिक : थंडीचा कडाका आणखी तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून, या भागातून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यामुळे राज्याच्या सर्वच भागातील किमान तापमानात घट झाली आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये गारठा चांगलाच वाढला आहे. या भागात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 5 ते 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला आहे.

देशातील नीचांकी तापमान…

उत्तर भारतातील पंजाब, हरिराणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यामध्ये सध्या थंडीची लाट आहे. पंजाबच्या अमृतसरमधील तापमान 1.0 अंशांपर्यंत खाली आले आहे. सपाट भूभागावरील देशातील हे नीचांकी तापमान ठरले आहे. राज्यातील निरभ्र आकाश आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत सर्वच भागातील किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. थंड वाऱ्यांचा परिणाम म्हणून निफाड येथे 1.8 अंशांपर्रंत तापमान घसरले होते. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातही किमान तापमानात घट झाली. कोकणात सरासरीच्या तुलनेत तापमानात 1 ते 5 अंशांनी घट नोंदविण्यात आली. मुंबईतील सांताक्रुझ येथील किमान तापमानात सरासरीपेक्षा 5 अंशांनी घट झाली.