रावेर- तालुक्यातील थोरगव्हाण येथील दोन कुपनलिकांची पाणी पातळी घसरल्यामुळे गावात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याबाबत माहिती मिळताच तहसीलदार विजयकुमार ढगे, गटविकास अधिकारी एच.एन. तडवी, पाणीटंचाई कक्षप्रमुख अतुल कापडे यांनी गावास भेट देऊन विहिर अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना सरपंच व ग्रामसेवकांना केल्या आहेत. सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीचे थोरगव्हाण हे गाव आहे. गेल्या 15 दिवसांपासून दोन ते तीन दिवसाआड गावास पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, कुपनलिकेचे पाणी कमी झाल्यामुळे गावात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे यामुळे अधिका – यांनी गावास भेट दिली. जानेवारी महिन्यात मोरव्हाळनंतर थोरगव्हाण येथेही पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जानेवारीत ही स्थिती आहे यामुळे एप्रिल व मे महिन्यात कसे होणार? याची चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.