जळगाव : शाळेत विद्यार्थ्याची उपस्थिती वाढावी यासाठी शासनातर्फे नेहमी नवनवीन उपाययोजन केले जात असते. परंतु विद्यार्थ्याची उपस्थिती समाधानकारक नसल्याने विद्यार्थ्याची उपस्थिती वाढावी यासाठी शिक्षण विभागामार्फत नवीनच शक्कल लढवीली जात आहे. पुढील आठवड्यापासून प्रत्येक सोमवारी शिक्षकांना विद्यार्थ्यासमवेत सेल्फी काढून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठवावे लागणार आहे. त्याद्वारे हजरीची नोंद घेतली जाणार आहे. तसेच दररोज ‘उपस्थिती अॅप’च्या माध्यमातून हजेरी नोंद करावी लागणार आहे. ‘सेल्फी‘ च्या कार्यक्रमांमुळे शिक्षकांवरील ताण वाढणार आहे. शिक्षण विभागातर्फे हजेरी नोंदविण्यासाठी विशेष अॅप तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्याच्या उपस्थितीची माहिती दिली जाणार आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली. या अगोदरही व्हॉट्स अॅपद्वारे हजेरीची माहिती जिल्हा परिषदेला पाठवावी लागत होती.