शहराचे विद्रूपीकरण थांबविण्यासाठी कारवाईची मागणी
बारामती : बारामती शहरात कमानी उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. या कमानी रस्त्यावरच उभ्या केल्या जात आहेत. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर व्यापार्यांनी जाहिराती करण्यासाठी, योजना लोकांना समजावण्यासाठी तसेच दांडियाचे नियोजन केल्याची माहिती व्हावी यासाठी या कमानी उभारल्या जात आहेत. या कमानी कोसळून कोणताही धोका होऊ शकतो; त्यामुळे या कमानींना परवानगी देऊ नये अशी बारामतीकरांची मागणी आहे.
शहरात नगरपालिकेच्या परवानगीने जागोजागी नेहमीच कमानी उभारल्या जात आहेत. शहरात फ्लेक्स उभारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परवानगी नसल्यामुळे व्यावसायिकांनी तसेच राजकीय नेत्यांनी कमानींचा आधार घेतला आहे. या कमानीमुळे रस्त्यांची खोदाईही केली जाते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रमाणही मोठे असते; मात्र याचे गांभीर्य नगरपालिकेला जाणवत नाही. याबद्दलही नागरिकांमध्ये नाराजी आहे. भर रस्त्याच्या वर्दळीत या कमानी उभारल्या गेल्यामुळे वाहतुकीसही अडथळे निर्माण होतात तसेच पायी चालणार्यांची गैरसोय होत असते. या सर्व बाबींचा विचार करून नगरपालिकेने या कमानींना परवानगी देऊ नये असेही नागरिकांचे मत आहे.कमानींसाठीची परवानगी अवघ्या तीन दिवसांसाठीच दिली जाते. मात्र दहा ते बारा दिवस काही वेळा तर महिनाभरही या कमानी उभ्या असतात.