नवी दिल्ली : काश्मीरमधील दहशतवादी आता जीव मुठीत घेऊन पळू लागले आहेत, टेरर फंडिंगविरोधातील कारवाईत एनआयएने यश मिळवले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत, असे धक्कादाखक वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री अरूण जेटली यांनी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केले. काश्मीर खोर्यात दररोज दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमकी होत असताना व काश्मीरमधील परिस्थिती अस्थिर झालेली असताना जेटलींनी अशाप्रकारचे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
केंद्राने कंबर कसली
या कार्यक्रमात जेटली म्हणाले, काश्मीरमधून दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करणे ही केंद्राची प्राथमिकता आहे. सैन्यदल आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांमुळे दहशतावद्यांवर दबाव वाढतो आहे. तसेच नोटाबंदीमुळेही दहशतवाद्यांचे अनेक मनसुबे धुळीला मिळालेत. गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर खोर्यांमध्ये दहशतवादी आपले कट आखून तशा कारवाया करत होते, मात्र त्यांना वेसण घालण्यासाठी केंद्राने कंबर कसली आहे, कोणताही दहशतवादी आता जास्त काळ जगू शकत नाही, तसेच दहशत पसरविण्याचा विचारही करू शकत नाही. जम्मू काश्मीर पोलीस, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सैन्य दल यांचे हे यश आहे. या सगळ्यांनी अत्यंत मेहनत घेऊन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असेही जेटली म्हणाले.
आता मोजकेच दहशतवादी उरले
पूर्वी एखाद्या दहशतवाद्याला ठार करण्यात आले की हजारो लोक तिथे यायचे आणि सैन्यदलावर दगडफेक करायचे आता ही संख्या 20 ते 30 लोकांच्या जमावावर आली आहे. काही दिवसांनी तर हे लोक येणेही बंद होईल. काश्मीर खोर्यात आता मोजकेच दहशतवादी उरले आहेत. तेही जीव मुठीत घेऊन पलायन करत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच पाकिस्तानला हे वाटत नाही की काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे, काश्मीर भारतात असूनही पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत. काश्मीर खोर्यात दहशत पसरविण्याचे काम पाकिस्तानकडून सातत्याने सुरू असते. पाकिस्तानला काहीही करून काश्मीरवर कब्जा मिळवायचा आहे मात्र त्यांचा हा मनसुबा कधीच पूर्ण होऊ शकत नाही, असे जेटली म्हणाले.