दहावी गणिताची फेरपरीक्षा नाही

0

सीबीएसई पेपरफुटीचे प्रकरण
दिल्ली एनसीआर, हरियाणातील विद्यार्थ्यांनाही दिलासा

नवी दिल्ली : परीक्षेपूर्वीच फुटलेल्या दहावीच्या गणित विषयाच्या पेपरची फेरपरीक्षा न घेण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतला आहे. याबाबत अधिकृत निर्णय मंडळाकडून जाहीर करण्यात येणार आहे.

परिणाम सार्वत्रिक नाही
सीबीएसई दहावीचा गणिताचा पेपर फुटल्याने देशात खळबळ उडाली होती. केंद्र सरकारने फेरपरीक्षा घेण्याचा विचार सुरू केला होता. मात्र, त्याला देशभरातून विरोध झाल्याने बॅकफूटवर जात सरकारने केवळ पेपर फुटलेल्या ठिकाणी, म्हणजेच दिल्ली एनसीआर व हरियाणा येथेच फेरपरीक्षा घेतली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, आता कुठेही फेरपरीक्षा होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. नव्या निर्णयामुळे दिल्ली एनसीआर व हरियाणातील विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे. काही उत्तरपत्रिकांच्या तपासणीनंतर बोर्ड या निर्णयाप्रत आले आहे. पेपरफुटीचा परिणाम सार्वत्रिक नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे फेरपरीक्षा घेणे योग्य ठरणार नाही, असे बोर्डाचे मत आहे.