दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेला अकरा वाजेनंतर ‘नो एन्ट्री’

0

नवापूर (हेमंत पाटील)। मार्च 2018 मध्ये दहावी व बारावीची बोर्डाची परीक्षा देणार्‍या लेटकमर्स विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात आता प्रवेश देण्यात येणार नाही. त्यामुळे सकाळी अकरा वाजेल्यानंतर परीक्षागृहात आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेलाच मुकावे लागणार आहे. यापूर्वी परीक्षेला येणार्‍या विद्यार्थ्यांना अर्धा तास उशीर ग्राह्य धरला जात होता. मात्र, पहिल्या अर्ध्या तासात प्रश्‍नपत्रिका फुटण्याच्या घटना राज्यात काही महत्त्वाच्या केंद्रावर घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर पेपर फुटीचे प्रकार टाळण्यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेतील पहिला अर्ध्या तासात प्रश्‍नप्रत्रिका सोशल मीडियाद्वारे ‘लीक’ करून गोलमाल करणार्‍यांना या निर्णयामुळे चाप बसणार आहे. याबाबत सरकारच्या शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे. परीक्षा केंद्रांचे नियोजन करणार्‍या शाळांमध्ये तो पाठवण्यात येणार आहे.

उशीरा आल्यास पेपरला मुकणार
येत्या परीक्षा सत्रापासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. वस्तूतः विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका शांतपणे वाचता यावी आणि परीक्षेचा ताण कमी व्हावा यासाठी सध्या अकरा वाजता पेपर असेल तर पावणेअकरा वाजता परीक्षागृहात प्रवेश दिला जातो. दुपारी तीन वाजता पेपर असेल तर पावणेतीन वाजता प्रवेश दिला जातो. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना अर्धा तास उशीरा येण्याची सवलत होती. मात्र आता परीक्षेसाठी अकरा किंवा तीन वाजता परीक्षागृहात न आल्यास त्या दिवशीचा पेपर लिहिता येणार नाही. या नियमाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे केंद्र संचालकांना बंधनकारक आहे. त्याबाबतचा अहवालही बोर्डाला द्यावा लागणार आहे.

सवलतीचा उचलला गैरफायदा
दहावी-बारावीच्या परीक्षेत गेल्या काही वर्षांत राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर पेपर फुटीच्या घटना घडल्या आहेत. यात परीक्षेची वेळ सुरू झाल्यानंतर अर्धा तास उशीरा येण्याच्या सवलतीचा गैरफायदा घेऊन पहिल्या अर्ध्या तासात प्रश्‍नपत्रिकेची छायांकित प्रत मिळवून त्यानंतर अर्ध्या तासाने परीक्षागृहात यायचे असा फंडा अनेक विद्यार्थी करत होते. यासाठी परीक्षा केंद्रातील कर्मचारी, प्रश्‍नपत्रिका संच ज्यांच्या ताब्यात आहे, असे हंगामी सुपरवायझर्सना आर्थिक आमिष दाखवले जात होते. परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात अशा प्रकारची गैरकृत्ये होत होती.

प्रश्‍नपत्रिकांचे सीलबंद पाकीट परीक्षा सुरू होण्याच्या वेळेला खुले केल्यानंतर केंद्रातील कर्मचार्‍यांना हाताशी धरून काही विद्यार्थी प्रश्‍नपत्रिकेची फोटोकॉपी मिळवतात. परीक्षेत कोणते प्रश्‍न आले आहेत ते सोशल मीडियाद्वारे लीक करतात. पहिल्या अर्ध्या तासात हा प्रकार करून विद्यार्थी परीक्षेला येतात. अशा घटनांच्या तक्रारींची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. उशीरा येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेशच दिला जाणार नाही. त्यामुळे गैरप्रकारांना निश्‍चित आळा बसेल.