मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपावर अभिनेते नाना पाटेकर यांनी अखेर आज मौन सोडलं आहे. ‘तनुश्रीच्या आरोपांना मी दहा वर्षांपूर्वीच उत्तर दिलं आहे. त्यामुळे नवं काही सांगण्याची गरज नाही. दहा वर्षांपूर्वी जे सत्य होतं, ते आजही सत्यच आहे. सत्य हे कायम सत्यच राहतं’, असं नाना पाटेकर यांनी म्हंटले आहे.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिल्यानंतर नानांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना उत्तर देणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यांनी आज अचानक नियोजित पत्रकार परिषद रद्द केली. पत्रकार परिषद रद्द झाल्यानंतरही पत्रकारांनी नानाच्या घराबाहेर ठाण मांडलं. त्यामुळे नानांचा मुलगा मल्हार मीडियाशी सामोरे गेला. ‘नाना ६९ वर्षाचे आहेत. त्यांची प्रकृती ठिक नाही. त्यामुळे ते तुमच्याशी बोलू शकणार नाहीत. एवढ्या मोठ्याप्रमाणावर मीडियाला सामोरे जाणं त्यांना शक्य नाही. येत्या २-४ दिवसांत ते मीडियाशी संवाद साधतील’, असं मल्हारने मीडियाला सांगितलं.
दरम्यान, मल्हारच्या निवेदनानंतरही मीडियाच्या विनंतीवरून नाना मीडियाला सामोरे गेले. ‘वकिलांनी मला या मुद्द्यावर भाष्य न करण्यास सांगितले आहे. जेंव्हा वकील सांगेल तेव्हाच मी मीडियासमोर येईल. मला नवीन काहीच सांगायचं नाही. दहा वर्षांपूर्वीच मी सत्य सांगितलं आहे. जे दहा वर्षांपूर्वी सत्य होतं, ते आजही सत्यच आहे. सत्य हे कायम सत्यच राहतं. माझी भूमिका कालही तिच होती आणि आजही तिच आहे’, असं नानांनी स्पष्ट केलं.