जळगाव : शहरातील सौरभ यशवंत चौधरी (31, रा.दशरथ नगर, जळगाव) या तरुणाच्या खून प्रकरणी मयताचा मित्र ईश्वर नथ्थू सपकाळे (25, रा.कानळदा) यास कानळदा शिवारातून अटक करण्यात आली. उधारीचे दहा हजार रुपये परत न केल्याच्या कारणातून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आला.
खून करीत फेकला मृतदेह
सोमवार, 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भादली ते शेळगाव दरम्यान पुलानजीकच्या पाटचारीत रस्त्याने जाणार्या लोकांना तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता क्रुरपणे सौरभचा गळा चिरलेला तर कपाळावर घाव घालण्यात आल्याचे दिसून आले होते. यानंतर एलसीबीने तपासचक्र गतिमान करीत अवघ्या तीन दिवसात गुन्हा उघडकीस आणला.
अवघ्या दहा हजाराच्या वादातून झाला खून
मयत सौरभ आणि ईश्वर हे दोघं मित्र होते. दोघे जण बर्याचदा सोबत दारू प्यायचे आणि गांजा देखील ओढायचे. मागील दीड दोन वर्षापूर्वी सौरभने ईश्वरकडे 10 हजार उधार मागितले होते परंतू ईश्वरकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या एका परीचयातील माणसाकडून दुसर्या एका व्यक्तीच्या मध्यस्थीने पैसे उधार घेऊन दिले होते. परंतू अनेक दिवस होऊन देखील सौरभ पैसे परत करत नव्हता आणि दुसरीकडे ईश्वरला पैसे देणार तगादा लावत होते.
सौरभने पैसे देण्यास नकार देत ईश्वरलाच दिली उडवण्याची धमकी
ईश्वर सतत सौरभकडे पैशांचा तकादा लावत होता. काही दिवसांपूर्वी ईश्वरने पैसे मागितल्यावर सौरभने स्पष्ट नकार देत पैसे देणार नाही, तुझ्याकडून जे होईल ते करून घे. तसेच तू जास्त मागे लागला तर तुलाच उडवून टाकेल अशी धमकी दिली. त्यामुळे ईश्वर तेव्हापासून अस्वस्थ होता. घटनेच्या दिवशी यातून पुन्हा वाद झाला आणि ईश्वरने सौरभचा खून केला.
‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं
घटनेच्या दिवशी सौरभ हा सकाळपासून मद्याच्या नशेत होता. सायंकाळी त्याने आपल्या मेहुण्याकडून 500 रुपये उधार घेतले. त्याचवेळी श्रीराम चौकात ईश्वर त्याला भेटला. यावेळी ईश्वर ने पुन्हा पैशांचा विषय काढला. त्यावर सौरभने चल दारू पिऊ आणि त्यावर विषयावर बोलू असे सांगितले. त्यानंतर दोघं जण आपल्या मोटार सायकलवरून असोद्याच्या दिशेने निघाले. असोद्याजवळ एका टपरीवर त्यांनी दारू मिळेल का?, अशी विचारणा केली. परंतू तिथं दारू नसल्यामुळे त्यांनी तेथून पाण्याची बाटली आणि स्प्राईटची बाटली घेतली आणि भादली शिवारातील भादली-कानसवाडा रस्त्यावरील पाटचारीवर पोहचले. याठिकाणी दोघांनी गांजा ओढला.
आणि ईश्वरने डोक्यात टाकला रॉड
गांजा ओढल्यानंतर दोघे झोपून एकमेकाशी गप्पा मारायला लागले. यावेळी ईश्वरने पुन्हा एकदा पैशांचा विषय काढला. त्यावर सौरभने पैसे देणार नाही आणि तू जास्त मागे लागला तर तुला उडवून टाकेल अशी पुन्हा धमकी दिली. ईश्वरला वाटलं खरचं सौरभ आपल्याला मारून टाकेल की काय?. त्याने क्षणाचाही विलंब न करता दुचाकीवर शेतात कामासाठी नेलेल्या पिशवीतून रॉड काढून सौरभच्या डोक्यात टाकला. तीन वेळेस डोक्यात रॉड टाकल्यानंतर विळ्याने सौरभवर अंधाधुंद वार करायला सुरुवात केली. तिथून घरी जातांना ईश्वरने असोद्याजवळील त्याच पान टपरीलगत पाण्याच्या हाळवर हाथपाय धुतले आणि घरी जाऊन कपडे बदले. तसेच दुसर्या दिवसापासून घरातून पसार झाला.
या पथकाने केला खुनाचा उलगडा
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक अमोल देवळे, सहायक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदीप साळवे, रणजीत जाधव, विनोद पाटील, किशोर राठोड, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, ईश्वर पाटील, रमेश जाधव यांनी या खुनाचा उलगडा केला.