नवी दिल्ली: देशात दिवसागणिक करोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालल्याने गंभीर समस्या उभी राहिली आहे. दिवसागणिक वाढणारा आकडा चिंता करायला लावणारा असतानाच आता काहीसा दिलासा देखील मिळाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असला तरी दुसरीकडे बरे होण्याचे प्रमाण देखील मोठे आहे. भारतामधील करोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ६० टक्केंपेक्षा जास्त आहे. देशातील रुग्णसंख्या सात लाखांच्या जवळ पोहोचले आहे. यापैकी ४ लाख २४ हजार ४३३ जणांनी करोनावर मात केली आहे.
लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्यापासून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे २४ हजार २४८ रुग्ण आढळले असून, देशभरातील रुग्णसंख्या ६ लाख ९७ हजार ४१३ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताने तिसऱ्या स्थानी असलेल्या रशियाला मागे टाकले आहे.
देशभरात २ लाख ५३ हजार २८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, आसाम आणि बिहार या राज्यांत रुग्णवाढ अधिक आहे.