दिलासादायक: रिकव्हरी रेटमध्ये भारतच जगात अव्वल

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज ८५ हजारपेक्षा अधिकने भर पडत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५९ लाखांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी २५ सप्टेंबरला एकाच दिवशी देशात ८५ हजार ३६२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहे. २४ तासात १०८९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल आहे. मात्र दुसरीकडे समाधानकारक बाब म्हणजे भारतातील रिकव्हरी रेट देखील अधिक आहे. देशात आतापर्यंत ४८ लाख ४९ हजार ५८५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आजच्या घडीला ९ लाख ६० हजार ९६९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. भारतातील रिकव्हरी रेट हा जगापेक्षा अधिक आहे. भारतातील रिकव्हरी रेट ८२.१४ टक्के आहे. तर सध्या अॅक्टीव्ह रेट १६.२८ टक्के आहे.

भारतातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहे. मात्र महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट देखील ७६ टक्के आहे. महाराष्ट्रात सध्या २ लाख ७२ हजार ७७५ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. ९ लाख ९२ हजार ८०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील २४ तासात महाराष्ट्र १७ हजार ७९४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर १९ हजार ५९२ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.