दिलासादायक: ५२ लाख रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

0

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज ८० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु दुसरीकडे दिलासादायक परीस्थिती म्हणजे रिकव्हरी रेट देखील मोठा आहे. रिकव्हरी रेटच्या बाबतीत भारत जगात अव्वल आहे. भारतातील रिकव्हरी रेट ८४ टक्क्यांच्या जवळ आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८० हजार ७७२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर १ हजार १७९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

गेल्या चोवीस तासांत देशात ८० हजार ४७२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून करोनाबाधितांची एकूण संख्या आता ६२ लाख २५ हजार ७६४ वर पोहोचली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५१ लाख ८७ हजार ८२६ जणांनी करोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे देशात ९ लाख ४० हजार ४४१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. आतापर्यंत करोनामुळे देशात ९७ हजार ४९७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

याव्यतिरिक्त देशात मोठ्या प्रमाणात करोना चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. मंगळवारी देशात एकूण १० लाख ८६ हजार ६८८ करोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशभरात ७ कोटी ४१ लाख ९६ हजार ७२९ करोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.