दिल्लीत भाजपच्या अहंकाराचा पराभव: शरद पवार

0

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सत्ता कायम राखली आहे. भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. भाजपने मोठी फौज दिल्ली निवडणुकीच्या मैदानात उतरविली होती. मात्र भाजपला जनतेने नाकारले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. दिल्लीत मोठा विजय मिळविल्याबद्दल त्यांनी केजरीवालांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीत भाजपच्या अहंकाराचा पराभव झाल्याचे आरोप शरद पवारांनी केले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल हे अगोदरच निश्‍चित होते. त्यामुळे दिल्लीच्या निकालावरुन आश्‍चर्य वाटत नसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

अरविंद केजरीवाल सलग तिसर्‍यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे जवळपास निश्चित आहे. या सर्वांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आम आदमी पक्षाने 62 जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजपला केवळ 10 जागांवर आघाडी घेता आली आहे. कॉग्रेसला शुन्य जागा आहेत.

राहुल गांधी यांनी दंडूके मारण्याची भाषा करु नये

कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर देखील शरद पवारांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी यांनी दंडूके मारण्याची भाषा करु नये. पंतप्रधान पदाची गरीमा राखली गेली पाहिजे असे पवारांनी सांगितले.