दिल्लीत मुजरा करण्यासाठी ‘जळगाव’च्या गल्लीत गोंधळ

0

रोख‘ठोक’ भाष्य

जळगाव । (डॉ. युवराज परदेशी) । ज्या लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला तोच जळगाव लोकसभा मतदारसंघ आज भाजपासाठी डोकेदुखी ठरत आहे. ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’ अशी गत भाजपाची झाली आहे. निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासून मतदारसंघात रंगणारे राजकीय कुरघोड्यांचे डाव व यात प्रतिस्पर्धी – विरोधकांपेक्षा स्वकियांच्या कटकारस्थानांमुळे पक्षाला आणि नेत्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. विजयाची हॅक्ट्रीक करण्यासाठी विद्यमान खासदार ए. टी. पाटील उत्सुक असतांना सोशल मीडियामध्ये कथित छायाचित्र व्हायरल झाल्याने त्यांचे तिकीट कापून विधानपरिषद सदस्या स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली. या षड्यंत्रामागे भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा हात असल्याचा जाहीर आरोप करीत खा. पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावला. कार्यकर्ता मेळावे, संपर्क अभियान राबवत त्यांनी उमेदवार बदलाची मागणी लावून धरत पक्षावर दबावतंत्राचा वापर केला. याचवेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले मात्र, भाजपाला पाठिंबा देणारे आमदार शिरीष चौधरी यांनीही अपक्ष अर्ज दाखल करण्याची भूमिका जाहीर केली.

दरम्यान, वाघ यांच्या उमेदवारीवरुन पक्षांंतर्गत धूसफूस सुरु होती. याचे प्रमुख कारण म्हणजे उदय वाघ यांची कार्यपध्दती. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आ. स्मिता वाघ यांना विरोध नसला तरी उदय वाघांवर रोष होता. हा रोष असण्यामागे ‘अर्थ’पूर्ण कारण वाघांसह कार्यकर्त्यांना अधिक माहित आहे. याचा फटका वाघांना बसला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तीन दिवसांनी पक्षाने त्यांचे तिकीट कापून चाळीसगावचे युवा आमदार उन्मेश पाटील यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

गिरीष महाजनांची पहिली पसंती होते उन्मेश पाटील

या मतदारसंघात भाजपाकडून डझनभर नेत्यांची नावे चर्चेत होती. यात महाजनांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सेवानिवृत्त अभियंता प्रकाश पाटील व आ. उन्मेश पाटील यांचे नाव आघाडीवर होते. प्रकाश पाटील हे पक्षाचे कार्यकर्ते नसल्याने त्यांच्या नावाला विरोध होता. त्यामुळे आ. पाटील यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले होते. मात्र ते स्वत: लोकसभा लढण्यास इच्छूक नव्हते. या वादात अभाविपचे कार्ड खेळत आ. स्मिता वाघ यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने बाजी मारली. या खेळीमुळे ना. महाजन देखील दुखावले गेले असावेत, मात्र त्यांच्याकडेही पर्याय उपलब्ध नव्हता. एकीकडे पक्षाने स्मिता वाघ यांच्या नावाची घोषणा केल्यानंतरही खा. पाटील यांनी नाराजीचे शस्त्र उपसत मतदारसंघात स्वतंत्र मेळावे व कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी सुरु केल्या. ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र त्यांनी ना. महाजन व जिल्हाध्यक्ष वाघ यांच्यावर तोफ डागत उमेदवार बदलाची मागणी केली. यामुळे ते पक्ष सोडणार नाही किंवा अपक्ष देखील उभे राहणार नाही, असे संकेत मिळाले होते. दुसरीकडे स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचाराला धडाक्यात सुरुवात केली. यावेळी पक्षाने त्यांनी एबी फॉर्म दिला की नाही? यावर देखील चर्चा रंगली. या वादात भाजपाचे सहयोगी आमदार शिरीष चौैधरी यांनीही अचानक उडी घेत आ. स्मिता वाघ यांच्या उमेदवारीचा विरोध केला. या पार्श्‍वभूमीवर केवळ अंतर्गत गटबाजीमुळे जळगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपावर वरचढ चढेल, असे चित्र निर्माण झाले. यामुळे पक्षाने स्मिता वाघ यांचे तिकीट कापण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे डार्कहॉर्स समजल्या जाणार्‍या आ. उन्मेश पाटील यांच्यावर पक्षाने विश्‍वास दाखविला आहे. महाजन यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे. आतापर्यंत नाशिक, जळगाव व धुळे महापालिकांमध्ये चाललेली ‘महाजनकी’ येथेही चालते का? याकडे सवार्र्ंचे लक्ष लागून आहे.