इस्लामाबाद: दिल्ली येथील हिंसाचारावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाझीवादाचे अनुकरण करुन आपल्या हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असल्याचे इम्रान यांनी म्हटलं आहे. जर्मनीत नाझीने ज्याप्रमाणे अत्याचार केला होता, तसाच प्रकार दिल्लीतील हिंसारातील घटनांचे फोटो पाहून दिसत आहे. जगाने मोदींची ही कट्टरतवादी प्रतिमा स्विकारयला हवी, असेही खान यांनी म्हटले आहे.
ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचा वणवा शमला असला तरी तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील या हिंसाचारावर इम्रान खाननेही मोदींना जबाबदार धरले असून २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणेच दिल्लीचाही हिंसाचार असल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे. तर, मोदी हे नाझीप्रमाणे आणि हिटरलच्या पद्धतीने वागत असल्याचा गंभीर आरोपही इम्रान यांनी केला आहे.
दरम्यान, यापूर्वीही इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावरुन मोदींना टार्गेट केलं होतं. भारतात मोदी सरकार असेपर्यंत काश्मीरच्या मुद्द्यावर काहीच आशा नसल्याचं खान यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान म्हटले होते. मोदी सरकारच्या कार्यकाळात काश्मीर मुद्द्याबाबत समाधान होऊच शकत नाही. मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाजी आणि हटलर यांच्या विचारधारेचं अनुकरण करतात. त्यामुळे, भारतात मोदींचे सरकार असेपर्यंत काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघणार नसल्याचं खान यांनी म्हटलं होतं.