मुंबई : दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी असल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. बुधवारी ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आणि त्यानंतर शुक्रवारी ९ तासखेला भाऊबीज असल्याने बँका बंद असतील. तर १० तारखेला दुसरा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी आहे. त्यानंतर ११ नोव्हेंबरला रविवार असल्याने पुन्हा बँका बंद असतील. त्यामुळे तुमची काही महत्त्वाची कामे असल्यास ती आताच करुन घ्यावीत. अन्यथा दिवाळीनंतर बँकांमध्ये एकच गर्दी होण्याची शक्यता आहे. ५ दिवस सलग बँकांना सुटी असल्याने लोकांची चांगलीच तारांबळ होऊ शकते.
दरम्यान बँकांना सलग ५ दिवस सुट्टी असल्याने एटीएममध्येही खडखडाट होऊ शकतो. त्यामुळे एटीएममधूनही वेळीच पैसे काढून ठेवायला हवेत असे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय किंवा इतर तातडीच्या खर्चांसाठी लागणारे पैशांची आधीच तजवीज केल्यास ऐन दिवाळीच तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना कराव लागणार नाही. दिवाळीत ट्रीपला जाणाऱ्यांची संख्याही जास्त असते. बाहेरगावी गेल्यावर लागतील तसे एटीएममधून पैसे काढू असे आपण म्हणतो. पण दिवाळीमुळे बँकांना असलेल्या सुट्ट्या लक्षात घेता असे करणे अडचणीचे ठरु शकते.