दुबळ्या आयर्लंडची भारतावर जोरदार मात

0

इंपोह (मलेशिया) । भारतीय हॉकी संघाने 27 व्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली आहे. स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात भारताला आयर्लंडकडून पराभव स्विकारावा लागला. मलेशियावर 5-1 ने मात केल्यानंतर अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला आयर्लंडवर मोठ्या फरकाने मात करणे गरजेचं होते. मात्र प्रत्यक्ष सामन्यात आयर्लंडच्या संघाने जोरदार पुनरागमन करत भारताला 3-2 अशा फरकाने पराभूत केलं. या पराभवासह भारताच्या या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मलेशियावर मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघासाठी अंतिम फेरीत प्रवेशाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा निराशाजनक खेळ केला. रमणदीप सिंहने 10 व्या तर अमित रोहिदासने 26 व्या मिनीटाला गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली होती.मात्र मध्यांतराच्या खेळानंतर आयर्लंडने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. वन-टच पास आणि 25 यार्ड सर्कलमध्ये आक्रमक चाली रचत आयरिश खेळाडूंनी भारतीय बचावफळीवर दडपण टाकायला सुरुवात केली.