दुष्काळाचा सीईओंकडून आढावा

0

रावेर पं.स.च्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील यांनी घेतला आढावा

रावेर- दुष्काळ असल्याने ग्रामपंचायतींनी पाण्याचे नियोजन करावे, वृक्ष लागवडीसाठी दिलेले उद्दीष्ट वेळेत पूर्ण करावे तसेच मनरेगाच्या माध्यमातून शोषखड्डे खोदावे तसेच तालुक्यात टँकरची गरज भासल्यास तहसीलदारांना कळविण्याच्या सूचना जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या. आढावा बैठकीसाठी पाटील मंगळवारी रावेरात आले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण राज्यात प्रथमच केलेल्या 960 मीटर विटवा-निंबोल संपूर्ण काँक्रिटीकरण रस्त्याला रस्त्याला भेट दिली तसेच पाडळसे, चिनावल, विवरे, विटवा, सांगवे आदी ग्राम पंचायतींना अचानक भेट देत कामांचा आढावा घेतला.

पंचायत समिती कामकाजाचा घेतला आढावा
पाटील यांनी रावेर पंचायत समितीत सर्व कर्मचार्‍यांची बैठक घेऊन शौचालय, घरकुल, दुष्काळ तसेच पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी नव्यानेच उभारल्या जात असलेल्या पंचायत समितीच्या ईमारतीची पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी हबीब तडवी, जि.प.बांधकामचे चोपडेकर, जलसंधारणचे जाधव, कुलकर्णी, बांधकाम अभियंता पराग पाटील, महाजन, स्वच्छ भारतचे समाधान निंभोरे, विस्तार अधिकारी महाले, सोनवणे आदी कर्मचारी उपस्थित होते.

खिरवड भष्ट्राचार प्रकरणी कारवाई होणार
खिरवड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या सुमारे 17 लाखांच्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे संकेत खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी दिले. ते म्हणाले की, मी स्वत: या प्रकरणी लक्ष घालत असून याआधी इतकी दिरंगाई का झाली? याची देखील चौकशी केली जाईल तसेच त्यांनी चौकशी अधिकारी हबीब तडवी यांना या प्रकरणाची माहिती नव्याने जिल्हा परीषदेत पाठविण्याच्या सूचना केल्या.

पुढच्या आठवड्यात आदिवासी गावांची पाहणी
शौचालय, घरकुल, दुष्काळ, पाणीटंचाई आदींचा आढावा व पाहणी करण्यासाठी पुन्हा रावेर तालुक्यात येणार असून शासनाच्या योजना गरीबांपर्यंत पोहचत आहे वा नाही याची देखील शहानिशा करणार असल्याचे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.