मुंबई- सध्या राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. राज्यात दुष्काळही जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत आहे. विरोधी पक्ष सरकारला दुष्काळावरून जाब विचारत आहे मात्र सरकारकडून विरोधी पक्ष दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचे आरोप होत आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्ष दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकारण करत नसल्याचे विधान परिषदेत सांगितले.
सरकारकडून विरोधकांवर आघाडी सरकारच्या काळात जानेवारी महिन्यात दुष्काळ जाहीर केले जायचे असे आरोप केले आहे. यावर धनंजय मुंडे यांनी २०१२ मध्ये आघाडी सरकारने ऑगस्ट महिन्यात दुष्काळ जाहीर केले असल्याचा पुरावा दिला. ऑगस्ट २०१२ मधील शासन निर्णय धनंजय मुंडे यांनी यावेळी दाखविला.
दुष्काळी मुद्द्यावरून सरकार जनतेची फसवणूक करत आहे. जनतेची दिशाभूल होत असल्याचे आरोप मुंडे यांनी केले.