दूध प्रश्नावरून अधिवेशनात जोरदार हंगामा 

0
दोन्ही सभागृह काही वेळासाठी तहकूब, सत्ताधाऱ्यांच्या आरोपांच्या फैरी, विधानसभेत विरोधकांनी केला सभात्याग
निलेश झालटे, नागपूर:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यात सुरु झालेल्या दूध बंद आंदोलनाचे तीव्र पडसाद सोमवारी विधानसभेत देखील उमटले. कर्नाटकच्या धर्तीवर दुधाला लिटरमागे प्रति लिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करावेत अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकारी दूध संघ संकलन बंद करुन शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारची भूमिका स्पष्ट नाही, राज्य सरकार या मुद्यावर गंभीर नाही असा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी विरोधकांनी राज्य सरकार विरोधी घोषणा देत गोंधळ घातल्यामुळे विधानसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. दुसरीकडे विधानपरिषदेत देखील दुधाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने रान उठविल्याने कामकाज काही वेळा तहकूब करावे लागले. दूध दराच्या  साठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधकांनी सभागृहाबाहेर देखील निदर्शने केली.
कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दूधदराच्या मुद्यावर चर्चेसाठी स्थगन प्रस्तावा अन्वये नोटीस दिली. विखे म्हणाले, राज्यात दुधाचा प्रश्न ऐरणीवर आहे. सरकारने भुकटीसाठी जाहीर केलेल्या अनुदानाचा फायदा संघांना होणार आहे. या निर्णयाचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. संपूर्ण राज्यात दूध संकलन बंद आहे. सरकार बंदोबस्तात दूध पाठवणार असल्याचे सांगते, बंदुकीच्या धाकावर शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. विरोधीपक्षांचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. सरकारने दुधाच्या निर्यातीला जाहीर केलेल्या अनुदानावरुन त्यांनी सरकारवर टीका केली. दुधाची निर्यात शक्य नसल्याचे सांगत त्यांनी सरकारला अशा कल्पना कोण देते असा सवालही उपस्थित केला. खासगी दूध संघांनी जाहीर केलेली तीन रुपयांची दरवाढ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे. सरकारने दुधाला किमान ३० रुपये दर जाहीर करावा आणि प्रति लिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी आमची मागणी आहे.
राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भुकटीसाठी जाहीर केलेले अनुदान संघांना मिळणार आहे, शेतकऱ्यांना काय असा सवाल उपस्थित केला. शेतकऱ्याचा दुधाला लिटरमागे २५ ते ३० रुपये खर्च येतो. प्रत्यक्षात, शेतकऱ्यांना १७ ते २० रुपये दर मिळतो. आंदोलनाचे गांभीर्य ओळखून सरकारने सर्व कामकाज बाजूला ठेवून या स्थगन प्रस्तावावर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली. शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, गायीच्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर आहे. शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करावा. भुकटीसाठी जाहीर केलेले अनुदान वर्षभरापर्यंत वाढवण्यात यावे. तसेच कर्नाटकप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना लिटरमागे पाच रुपये अनुदान जाहीर करावे.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी सरकारने दूध दरप्रश्नी घेतलेल्या निर्णयांची माहिती सभागृहाला दिली. भुकटीसाठी जाहीर केलेले अनुदान पुढील पाच महिन्यांसाठी वाढवण्याचा विचार केला जाईल. तसेच केंद्र सरकारने भुकटीच्या निर्यातीसाठी १० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. लवकरच दुधासाठी धोरण ठरवले जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.  यावर असमाधानी विरोधकांनी विधानसभेत सरकारविरोधात गोंधळ, घोषणाबाजी सुरु केली. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी भुकटीसाठी जाहीर केलेले अनुदान खासगी संघांना डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचा आरोप केला. महसूल व कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकारी दूध संघांनी संकलन बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीला धरल्याचा आरोप केला. हे आंदोलन शेतकरी विरोधी असून सरकार हे चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. यावरुन विरोधकांनी पुन्हा गोंधळ सुरु केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, दूध संघांनी शेतकऱ्यांच्या दुधाचा खरेदी दर कमी केला असला तरी विक्री दरात कोणतीही घट केलेली नाही. एकट्या गोकुळ दूध संघाकडून दररोज दहा लाख लिटर संकलन होते, असा दाखला देत शेतकऱ्यांना सरकार नाही तर दूध संघच लुटत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.  त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी हस्तक्षेप करीत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, दूध दराच्या प्रश्नावर गेल्या आठवड्यातही बैठक झाली. तेव्हा शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्यातील अडचणींवर चर्चा झाली आणि भुकटीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या परिस्थितीचा विचार करता मुख्यमंत्र्यांना उद्या पुन्हा एक बैठक घेऊन तोडगा काढण्याचे निर्देश देतो, कामकाज सुरु करा असे आवाहनही त्यांनी केले. शिवतारे यांच्या विधानाचा आधार घेत विखे पाटील यांनी सरसकट सर्व सहकारी संघांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. संघांनी घोटाळे केले असे चित्र निर्माण केले जात आहे. सहकारी संस्था या शेतकऱ्यांनी उभ्या केल्या आहेत. सहकाराला बदनाम करण्याचे प्रयत्न करु नका. नाणार तसेच आजच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, असे म्हणून त्यांनी सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच याप्रश्नी सरकार गंभीर नसल्याची टीका करीत सर्व विरोधकांनी सभात्याग केला.
शेतकऱ्यांच्या भावनांवर,दु:खावर आम्हाला बोलू दया 
-राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दु:खावर आणि त्यांच्या भावनांवर आम्हाला सभागृहात बोलायचे आहे. त्यामुळे आमदार सुनिल तटकरे यांनी मांडलेल्या २८९ प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. शेतकरी दुध काढतो,त्याचे पोट खपाटीला गेले अन् दुध पिणारे गब्बर झाले अशी भाषणे सदाभाऊ खोत यांनी पुण्याच्या सभेत केली होती त्याची आठवण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी करुन दिली. शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल राग आहे, सरकार बैठका घेत आहे पण शेतक-यांना हे मान्य नाही, किती दिवस शेतकऱ्यांचा बाजार मांडणार आहेत असा सवाल त्यांनी केला. दरम्यान राज्यकृषीमंत्री सदाभाऊ खोत उत्तर देण्यासाठी उभे राहिले असतानाच सभागृहात ‘भाव दया,भाव दया सदाभाऊ भाव दया’ अशी घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी कामकाज सभापतींनी तहकुब केले. दरम्यान कामकाज तहकुब करण्यापूर्वी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा गंभीर विषय असल्यामुळे २८९ प्रस्तावावर ९७ ची चर्चा मंगळवारी किंवा बुधवारी घेण्याचे जाहीर केले.
 5 रूपये अनुदानासाठी विधानभवनात ‘घंटानाद’ 
भाजप सरकार हाय हाय… दुध उत्पादकांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घंटानाद आंदोलन केले. दुध उत्पादकांचे आंदोलन आज राज्यभर तीव्र झाले असून त्याचे पडसाद आज दोन्ही सभागृहात उमटले. सभागृहामध्ये सरकारकडून दुध उत्पादकांना योग्य तो हमीभाव मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाले आणि त्यांच्यासोबत काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येवून घंटा वाजवून जोरदार आंदोलन केले.