पुणे:- राज्यात सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुणीही राजकारण करू नये, या काळात सर्वानी मिळून काम करण्याची गरज आहे. पण यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारण करीत असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंगेरी लाल’ प्रमाणे सत्तेची स्वप्न पाहू नयेत, अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला, ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला कोरोना विरोधात लढ्यासाठी काही सूचना केल्या. तसेच अशा काळात कोणीही राजकारण करू नये असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपल्या नेत्यांचे तरी त्यांनी अनुकरण करावे, असा सल्ला देशमुख यांनी फडणवीस यांना दिला.
देशमुख पुढे म्हणाले, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहातून आत्तापर्यंत ९ हजार कैदी सोडण्यात आले असून, ११ हजार कैदी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आता नव्याने २४ जिल्ह्यात ३१ शाळांमध्ये तात्पुरते कारागृह तयार करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.