नवी दिल्ली: गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. ढगाळ वातावरण आहे. देशभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सोमवारी आणि मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थान आणि गुजरातमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये हवामान विभागाने वादळाचा अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेशातली झाबुआ येथे अचानक हवामान बदलल्यानंतर मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत.उदयपूर आणि झालावड येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उदयपूरमध्ये विजेचे जवळपास 800 खांब आणि 70 ट्रान्सफॉर्मर कोसळले. अहमदाबाद, राजकोट, महेसाणा, साबरकांठा, आणंद भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.