देशातही आता हिटलरशाही सुरु आहे – मल्लिकार्जुन खरगे

0

कोल्हापूर : केंद्र आणि राज्यातील सरकार दोन्हीं खोटी आश्वासने देतात. खोटे बोलून सत्ता काबीज करण्याची कला नरेंद्र मोदी यांनी हिटलरपासून शिकली आहे. देशातही आता हिटलरशाही सुरु आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रभारी, लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी कोल्हापूरमध्ये केला. धर्माच्या नावावर दुसऱ्याचे जीव घेण्याचे प्रकार देशात चालणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. कोल्हापुरमध्ये शुक्रवारी या संघर्ष यात्रेस सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार सतेज पाटील यांच्यासह आदी नेते या यात्रेत सहभागी झाले होते.

खरगे म्हणाले की , पुरोगामी विचारांचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात पानसरे, दाभोलकर यांच्यासारख्या समाजसुधारकांचे खून होत असून त्यांचे मारेकरी मोकाट आहेत. पण सरकारी यंत्रणा पुरोगामी विचारांच्या चळवळीमधील कार्यकर्त्यांना अटक करत आहे तर दुसरीकडे, सनातन सारख्या संस्थांना पाठबळ दिले जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा हवी की सनातन सारखी याचा विचार करणे गरजेचे आहे. आमची ही मतांची नव्हे तर तत्वाची लढाई असून विखारी प्रवृत्ती विरोधात काँग्रेस सदैव लढत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकार देशात सत्तेत आल्यापासून वातावरण कलुषित होत असून विद्यमान सरकार दलित, अल्पसंख्यांक, आदिवासींवर अत्याचार करणा-यांना संरक्षण देत आहे. या घटकांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या अत्याचारी व हुकुमशाही सरकारविरोधात जनमत निर्माण झाल्याचेही खरगे यांनी नमूद केले.