पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यात पत्नी म्हणून एकरुप झालेल्या आणि संभाजी महाराजांच्या हत्येनंतर संयमीपणे उभे रहात देशाला गौरव प्राप्त करुन देणारे महाराणी येसूबाईंचे व्यक्तिमत्व होते. मराठयांच्या इतिहासात अनेक शूर स्त्रिया होऊन गेल्या. परंतु परकीयांच्या कैदेत असताना संयमाने सर्व परिस्थितीला ३० वर्षे तोंड देणा-या त्या एकमेव स्त्री आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.सदाशिव शिवदे यांनी केले.
प्रॉलिफिक पब्लिकेशन जळगाव तर्फे साकारलेल्या व सुलभा राजीव लिखित येसूबाई या कादंबरीचे प्रकाशन पत्रकार भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, डॉ.अरुणचंद्र पाठक, डॉ. मनिषा बाठे, प्रकाशक राजीव कुलकर्णी, लेखिका सुलभा राजीव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ.सदाशिव शिवदे म्हणाले, महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील कादंबरी लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. कादंबरी लेखन करताना प्रचंड अभ्यासासह चिंतनाची जोड आवश्यक असते. मनन, चिंतन, चिकित्सा आणि लेखन हे कादंबरी लेखनाचे टप्पे आहेत. त्यासाठी लागणारी उपजत प्रतिभा लेखकाकडे असणे आवश्यक आहे.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, महाराणी येसूबाईंच्या जीवनात अनेक संकटे आली. परंतु संकटांशी धिरोदत्तपणे सामना करीत यशस्वीपणे त्या जीवन जगल्या आणि आपली कर्तव्ये पार पाडली. अत्यंत निराशाजनक परिस्थितीत त्यांनी जीवन व्यतीत केले. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचा कार्यकाळ येसूबाईंनी पाहिला होता. दिल्लीत सत्ता काबीज केल्यानंतर मराठयांनी येसूबाईंना स्वगृही सातारा येथे आणले. तोपर्यंतचा जीवनपट इतिहासाला माहित आहे. परंतु साता-यात आल्यानंतर तेथील सतराव्या शतकातील या महापतीव्रतीचे जीवन आणि मृत्युचा दिनांक देखील इतिहासाला माहित नाही हे दुर्देव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ.मनिषा बाठे म्हणाल्या, ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजांचे बौद्धिकपणे झाकले गेले. त्याप्रमाणे येसूबाईंच्या रुपाने त्यांच्यामागे असलेल्या बळकट सावल्यादेखील झाकल्या गेल्या. मात्र, सुलभा राजीव यांनी कादंबरीच्या माध्यमातून त्यांचे कार्य पुढे आणले. संशोधन लोकांपर्यंत पोहोचत नाही. प्रत्यक्षात संशोधनाचा आत्मा सुंदर असतो. त्या आत्म्याला काया देण्याचे काम सुलभा राजीव यांच्यासारख्या कादंबरीकाराने केले आहे.
लेखिका सुलभा राजीव म्हणाल्या, सुमारे ३५० वर्षांपूर्वी स्त्रियांवर बंधने होती, तरीही येसूबाईंनी धिरोत्तरपणे सर्व परिस्थितीवर मात केली. त्यांचा ३० वर्षांचा संघर्ष शब्दांत मांडणे, हे अवघड होते. येसूबाईंचा प्रत्येक संकटाला न डगमगता मार्ग काढण्याचा स्वभाव, ती मार्दवता, तो आदर्श इतर स्त्रियांनी अंगिकारावा, यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी सांगितले. राजीव कुलकर्णी, श्रद्धा शुक्ल, योगेश शुक्ल, रसिका मुजूमदार यांनी कादंबरीचे अभिवाचन केले. सुनील कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अमेय बाकरे यांनी आभार मानले.