बंगळुरू । देशातील सध्याच्या वातावरणावर चिंता व्यक्त करत विख्यात कवि आणि गीतकार गुलजार यांनी येथील एका कार्यक्रमात भाष्य केले आहे. यात त्यांनी विविध स्थितींसह भाषांबाबतच असहिष्णुतेबाबत टीकास्त्र सोडले आहे. विशेष करून हिंदी भाषिक लोक हे अन्य भाषांबाबत अन्याय करत असल्याचे सांगून आपण राजकीयदृष्टया स्वतंत्र झालो असलो तरी सांस्कृतीकदृष्टया स्वतंत्र नसल्याचे सांगून आपला रोष प्रकट केला आहे.
प्रादेशिक भाषांवर अन्याय
याप्रसंगी गुलजार यांनी भाषांबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, “आपल्या देशात तामिळ, गुजराती, मराठी, बंगाली यांसह अनेक भाषांना प्रांतिय भाषांचा दर्जा दिला जातो मात्र या भाषांना प्रांतिय म्हणणं चूक आहे, या भाषा देशातल्या प्रमुख भाषा आहेत.” देशासमोर आर्थिक संकट होतं मात्र धर्मिक संकट कधीही नव्हतं आता आपल्या देशात नाव विचारण्याआधी माणसाचा धर्म विचारला जातो ही परिस्थिती दुर्दैवी आहे, असंही मत गुलजार यांनी व्यक्त केलं आहे.
भारतीय परंपरा समृध्द
गुलजार हे बंगळुरू शहरातील एका बुक स्टोअरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलले. ते म्हणाले की, देशातल्या महाविद्यालयांमध्ये इंग्रजी साहित्य शिकवलं जातं मग भारतीय परंपरा का शिकवली जात नाही? कालिदास, युधीष्ठीर, द्रौपदी हे विषयही अभ्यासण्यासारखे आहेत. आपल्या संस्कृतीशी नातं सांगणारे जे विषय आहेत ते जर देशभरातल्या महाविद्यालयांमध्ये शिकवले गेले तर येणार्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होईल. सआदत मंटो सारख्या आधुनिक लेखकाबाबतही महाविद्यालयांमध्ये शिकवलं पाहिजे.
तुकड्यांचे आयुष्य
गुलाजार म्हणाले की, आपण आपलं आयुष्य काही तुकड्यांमध्ये जगतो, कारण आपल्याला ते सोपं वाटतं, सुधारमतवादी लेखक डॉक्टर कलबुर्गी यांच्याबाबत मी लिखाण केलं आहे. धारवाडमध्ये त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली त्यावेळी मला वेदना झाल्या. विविध भाषांमध्ये त्यांनी लिखाण केलं होतं, लेखनाला वेगळी उंची गाठून देणार्या माणसाचा शेवट आपल्या देशात असा होतो? हे वातावरण खूपच वाईट आहे असंही गुलजार यांनी म्हटलं आहे. भारतात सध्याच्या घडीला राजकीय स्वातंत्र्य आहे मात्र सांस्कृतिक स्वातंत्र्य नाही. आपण मागासलेल्या मानसिकतेतून अजून बाहेरच आलेलो नाहीत.