धक्कादायक: जय श्रीरामचे नारे देण्याची शक्ती करत जमावाकडून तरुणाची हत्या

0

रांची: ‘जय श्रीरामचे नारे दे’ असे म्हणत एका तरूणाला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना झारखंडमधील रांची येथे घडली. उपचारादरम्यान या तरूणाचा मृत्यू झाला. शम्स तरबेज असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. बाईक चोरल्याच्या संशयावरून त्याला मारहाण करण्यात आली. मारहाण करताना जमावाने तरबेजला ‘जय श्रीराम’ जय हनुमान या घोषणा देण्याची सक्ती केली होती. मागच्या मंगळवारी हा सगळा प्रकार घडला त्यानंतर तरबेजला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तरबेजच्या मृत्यू प्रकरणी आरोपी पप्पू मंडलला अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान तरबेजचा नातेवाईक मक्सुद आलम यानेही तरबेजला जमावाने मारहाण केली आणि जय श्रीराम आणि जय हनुमानचे नारे दे असे सांगत त्याला बडवलं असा आरोप केला आहे. तरबेज हे नावच मुस्लीम असल्याने जमावाने त्याला मारहाण केली. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना अटक करण्यात यावी अशीही मागणी मक्सुद आलमने केली आहे.

तरबेज हा पुण्यात वेल्डर म्हणून काम करत होता. कुटुंबीयांसोबत ईद साजरी करता यावी म्हणून झारखंडला गेला होता. येत्या काही दिवसात त्याचा निकाह देखील होणार होता. १८ जून रोजी दोघांसोबत तरबेज निघाला, त्या दोन व्यक्तींनी त्याची दिशाभूल करून त्याला घेऊन गेल्या. त्यानंतर आम्ही तुझ्यासोबत आहोतच असं दर्शवून या दोघांनी पोबारा केला आणि तरबेजला चोरीच्या आरोपावरून जमावाने जबरदस्त मारहाण केली अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते औरंगजेब अन्सारी यांनी एका वेबसाईटला दिली आहे.