शिवसेनेची झाली ‘भीवसेना’, भाजपपुढे टेकले गुडघे
सातारा । सातार्यातील पाटणमध्ये धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल आंदोलनात शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आता पूर्वीसारखी शिवसेना राहिलेली नाही, ती भीवसेना झाली आहे. पाच ते सहा मंत्रीपदांसाठी भाजपसमोर गुडघे टेकण्याचे काम सेना करत आहे. वेळोवेळी सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली जाते. मात्र राजीनामे काही खिशातून बाहेर निघत नाहीत, असे राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले.
राष्ट्रवादीचे नेते पूर्ण ताकदीने सत्ताधारी भाजप शिवसेनेवर हल्ला चढवत आहेत. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली. मुंडे यांनी पाटण नंतर उंब्रजमध्ये ही शिवसेना आणि मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. मुंडे म्हणाले की, 2014 च्या काळात देशभरातील तरुणाई दीड-दीड फुट उड्या मारत ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा घोषणा देत होती. त्यांना रोजगार देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. आता मोदी तरुणांना म्हणतात भजी तळा. पंतप्रधान मोदींना याचा हिशोब द्यावाच लागेल.