धनगर समाज जागतोय

0

राज्यात नुकतेच दोन मोठे कार्यक्रम पार पडले. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची 292 जयंतीचे ते कार्यक्रम होते. त्यानिमित्त महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धूमधडाक्यात कार्यक्रम घेण्यात येतात. जयंती दिवशी अहमदनगर जिल्ह्यातल्या चोंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी राज्यातला धनगर समाज बहुसंख्येने जमतो. भक्तिभावाने अहिल्यादेवींच्या प्रेरक चरित्राचे जागरण करतो. त्यापासून स्फूर्ती घेतो. दरवर्षी इथे मोठा मेळावा भरतो. याही वर्षी आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठा मेळावा झाला. मृदजलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष होते. राज्यातल्या कानाकोपर्‍यातून समाजबांधव इथे जमा झाले होते. धनगर समाजातले सर्व आजी-माजी मंत्री, आमदार-खासदार, कार्यकर्ते, जिल्हा परिषद-पंचायत समित्यांचे सदस्य, विविध पक्षांचे राजकीय कार्यकर्ते या मेळाव्याला हजर होते. या वेळी केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री एस. पी. सिंग बघेल हे मान्यवर उपस्थित होते. अण्णा डांगे, खासदार विकास महात्मेही यांचीही हजेरी महत्त्वाची ठरली. चोंडीचा मेळावा हा समाजाचा एकोपा आणि राजकीय जागृती दर्शवणारा कार्यक्रम असतो. गेल्या पाच वर्षांत धनगर समाज अधिक संघटित होऊन राज्याच्या राजकीय वातावरणात स्वत:ची जागा शोधताना दिसतोय. अनुसूचित जातीत समाविष्ट करा (एसटी आरक्षण द्या) या मागणीने जोर धरल्यानंतर धनगर समाजातील तरुण पिढी मोठ्या संख्येने राजकीयदृष्ट्या जागृत झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाजाने मोठमोठी आंदोलने उभी केली होती. त्यातले बारामती (जि. पुणे)चे आंदोलन वादळी ठरले होते. या आंदोलनातून जागी झालेली धनगर समाजातील तरुणांची नवी पिढी आरक्षण नाकारणार्‍या तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरोधात बंड करती झाली. भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सरकार आले की, पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देऊ, या आश्‍वासनामुळे हा समाज एकमुखी भाजपमागे एकवटला होता. आरक्षणाचे आंदोलन उभारून आणि भाजपची सोबत देऊन धनगर समाजाने राज्याच्या सत्ताबदलात आपला वाटा उचलला होता. महाराष्ट्रात या समाजाची ताकद दखलघेण्याजोगी आहे. त्याची राजकीय चेतना आता जागी झाली आहे.

आरक्षण ही या समाजाची प्रमुख मागणी असली, तरी धनगर समाजाचे इतर खूप महत्त्वाचे प्रश्‍न वर्षानुवर्षं भिजत पडलेले आहेत. या समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आणि मेळी-मेंढीपालन हा आहे. शेतकरी म्हणून जे प्रश्‍न इतर समुदायांचे आहेत त्यात धनगर समाजही भरडला जातोच आहे. शेतीप्रश्‍नात भरडला जात असणार्‍या या समाजाचे मेंढपाळ म्हणून असणारे प्रश्‍नही तेवढेच भीषण आहेत. शेळ्या-मेढ्यांना चारा न मिळणे, पाऊस कमी होतो त्यातून चराईची राने कमी होणे, त्यामुळे चार्‍याच्या शोधात मेंढ्या-शेळ्या घेऊन कुटुंबासह भटकंती वाढणे पूर्वी सहा महिन्यांची चारणी करावी लागे, आता वर्षभर मेंढपाळांना शेळ्या-मेंढ्या-घोडे मुले-बाळे घेऊन रानावनात भटकंती करावी लागते. या भटकंतीत शेळ्या-मेंढ्या चोरीचे प्रकार घडतात. त्यातून सुरक्षिततेचे प्रश्‍न निर्माण होतात. रानावनात भटकणार्‍या या मेंढपाळांपर्यंत पोलीस पोहोचत नाहीत. त्यामुळे या समाजाची लुबाडणूक करणारे गैरफायदा घेतात. या अडचणी, प्रश्‍नांच्या पार्श्‍वभूमीवर मेंढपाळांना पोलीस संरक्षण द्या, शेळ्या-मेंढ्यांना चरायला वनजमिनी भाड्याने द्या, शेळ्या-मेंढ्यांची खरेदी वजनावर, मटणाच्या बाजारभावानुसार करा, मेंढपाळांच्या मुलामुलींना अनुसूचित जातीतल्या मुलांसारख्या शैक्षणिक सवलती द्या, शेळ्या-मेंढ्यांना आणि मेंढपाळ कुटुंबाला विमा सवलत द्या, शेळ्या-मेंढ्यांसाठी आरोग्यसुविधा पुरवा, अशा मागण्या या समाजातून पुढे येत आहेत. हे प्रश्‍न सरकार सोडवत नाही, त्या रागातून मग आरक्षणाच्या मागणीमागे या समाजाचा असंतोष एकवटताना दिसतोय. आरक्षण आणि इतर प्रश्‍न यामुळे धनगर समाज अस्वस्थतेतून राजकीयदृष्ट्या संघटित होतोय. त्याचं प्रतिबिंब चोंडीच्या मेळाव्यात दिसणार आहे. चोंडीचा मेळावा सर्वपक्षीय व्हावा यासाठी जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी प्रयत्न केले. त्याला यश येताना दिसते आहे. शिंदे हे चोंडी गावचे नागरिक आहेत. आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते दरवर्षी मेळाव्याला आलेल्या सर्वांना जेवण देतात. आमदार, मंत्री नसतानाही ते हे करत असत. अहिल्यादेवी धनगर समाजाला प्रेरणा देणारे एक प्रतीक आहेत. सुभेदार मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवींचा राज्यकारभार, लोककल्याणकारी कामे यांचा स्वाभाविकपणे धनगर समाजाला अभिमान आहे. समाजकारणात, राजकारणात काम करायचे तर अहिल्यादेवींसारखे असे या समाजातल्या सर्वांना वाटते. अहिल्यादेवींच्या प्रेरक चरित्रातून या समाजातल्या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढतोय. चोंडीच्या मेळाव्यात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. त्यात धनगर आरक्षणाच्या प्रश्‍नावर चर्चा झाली. भाजप सरकार राज्यात सत्तेत येऊन अडीच वर्षे झाली आहेत. केंद्रात तीन वर्षे भाजप सरकार आहे. एवढा कालावधी उलटला, तरी आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही. ही या समाजातल्या सर्वांचीच खंत आहे. या आरक्षणाचा प्रश्‍न तर सुटत नाहीच, उलट आरक्षण कधी मिळणार, असा सवाल करणार्‍यांना राज्य सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी उलटसुलट उत्तरे दिली होती. स्वत: जानकर हे धनगर समाजाच्या ताकदीवर राजकारणात आले. आता ते या समाजाचे नेते म्हणून मंत्रिपदावर आहेत. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे सोडून ‘मी काही धनगरांमुळे मंत्री झालो नाही. मला बारामतीच्या धनगरांनी मते दिली नाहीत,’ अशी वादग्रस्त, डिवचणारी विधाने करून जानकरांनी कारण नसताना समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे समाजात जानकरांबद्दल नाराजी वाढू लागली आहे. या आधीही जानकरांच्या वागण्यामुळे कार्यकर्ते दुखावलेले आहेत. त्यामुळे धनगर समाजाचा रोष भाजप सरकारविरोधात व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारांमुळे जानकरांचे धनगर समाजातले प्रस्थ डळमळीत होत जाताना दिसते आहे. राज्यात धनगर समाजाची संख्या जवळपास दीड कोटीच्या आसपास आहे. राज्यातल्या 150 विधानसभा मतदारसंघांत या समाजाची संख्या दखलपात्र आहे. राजकीयदृष्ट्या संघटितपणे एखाद्या पक्षाच्या मागे उभे राहण्याची या समाजाची वर्तनपरंपरा आहे. माजी मंत्री शिवाजीराव शेडगे यांच्या नेतृत्वाखाली हा समाज काँग्रेससोबत राहत असे.

अण्णा डांगे यांच्या नेतृत्वाखाली या समाजाने भाजप-शिवसेनेला 1995 साली साथ दिली होती. त्यानंतर मधल्या काळात हा समाज शरद पवारांच्या सोबतही दिसला. मात्र 2014 नंतर हा समाज भाजपमागे एकवटला. भाजपने शिंदे, जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपदे दिली. डॉ. विकास महात्मेंना खासदार केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीत या समाजाला तिकिटे दिली. या सर्व घुसळणीतून हा समाज स्वत:चा सत्तेतला वाटा मागतोय. स्वत:ची राजकीय ओळख ठसवू पाहतोय. बहुजन समाजातली एक महत्त्वाची जात असलेला हा समाज जागा होणे ही लक्षणीय घटना आहे. समाजाच्या या जागृतीला सोबत घेऊन स्वत:चे नेतृत्व अधिक प्रगल्भ करण्याची संधी महादेव जानकरांकडे चालून आली होती, पण त्यांनी स्वकर्माने ती ठोकरल्याचं दिसतंय. जानकर समाजातल्या प्रवाहातून बाजूला पडत असताना राम शिंदे यांनी चोंडीत सर्व पक्षातले नेते आपल्यासोबत आहेत हे स्पष्ट केले आहे. जलसंधारण मंत्री म्हणून त्यांच्या कामाची प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा आहे. चतुर वक्ते आणि पॉलिटिकली करेक्ट भूमिका, समाजासोबत राहणे या खुब्यांमुळे शिंदे यांनी जानकरांवर मात करत भाजपमध्येही बहुजन नेता हे स्वत:चे स्थान पक्के केले आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्द्याने जो जोर धरला आणि त्यावर आश्‍वासन घेऊन हा समाज शांत बसला. जानकरांनी तो असंतोष गोळा केला होता. एक मोठी ताकद त्यांच्या मागे उभी होती. परंतु, भाजपने त्या आंदोलनाची धग आता पचवली आहे. राम शिंदेच्या माध्यमातून त्यांनी नवे नेतृत्व पुढे आणले आहे. जाणकरांची पकड सैल होत चालली आहे. हेच चित्र आता स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राची जमीन अव्याहत पणे तुडवलेले जाणकर हळूहळू विस्मृतीत जातील काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

– राजा आदाटे
८७६७५०११११