धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला

0

पुणे । जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरण पाणलोटक्षेत्रातील पावसाचा जोर मंगळवारपासून ओसरला आहे. मात्र, त्यापूर्वी झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने खडकवासला, गुंजवणी, कळमोडी, चासकमानसह 9 धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे.

गेले दोन आठवडे झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून 22.06 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात खडकवासला प्रकल्पातील धरणांत 16.76 टीएमसी पाणीसाठा होता. वरसगाव धरणक्षेत्रांत मंगळवारी सायंकाळी 5 पर्यंत 10, पानशेत, 8, खडकवासला 2 आणि टेमघरला 21 मिलिमीटर पाऊस झाला.

पानशेत 93.67 टक्के
टेमघरचा पाणीसाठा 1.89 (50.99 टक्के), वरसगाव 8.22 (64.09 टक्के), पानशेत 9.98 (93.67 टक्के) आणि खडकवासला धरण 1.97 टीएमसी इतके पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मंगळवारीदेखील 408 क्युसेक्सने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. पुणे शहरातदेखील दिवसभरात पावसाच्या काही सरी पडल्या. सायंकाळी 5 पर्यंत 0.2 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद वेधशाळेत झाली.

उजनीत 29.67 टक्के पाणीसाठा
पिंपळगाव जोगा धरणक्षेत्रात 9, माणिकडोह 2, येडगाव 6 आणि वडजला 7 मिलिमीटर पाऊस झाला. येडगाव धरणातील साठा 2.70 टीएमसी (96.56 टक्के) झाल्याने येथून 3 हजार 749 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. कळमोडी परिसरात 11, भामा आसखेड 12, वडिवळे 32, आंद्रा 15, पवना 28, कासारसाई 5 आणि मुळशी धरणक्षेत्रांत 13 मिलिमीटर पाऊस पडला.

जिल्ह्यातील धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात 15.90 (29.67 टक्के) टीएमसीपर्यंत वाढ झाली.