धोकादायक इमारतीत राहू नका!

0

नवी मुंबई : शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणानंतर एकूण 315 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 पोटकलम (1) (2) (3) (4) अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम 265 (अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरु होऊन 30 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींची नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परीक्षण करुन घेणे अनिवार्य आहे. 30 वर्षापेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजावयाचा आहे.या प्रकारे संरचना परीक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था/मालक/भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना रुपये 25000/- अथवा सदर मिळकतीचे वार्षिक मालमता कराची रक्कम यातील जी जास्त असेल, तितक्या रक्कमेचा दंड ठोठवायची तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 398 (अ) खाली अंतर्भूत करण्यात आली आहे.पावसाळा कालावधीत धोकादायक झालेल्या इमारतींचा / घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. त्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ शकते. म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, धोकादायक इमारतींचा / घरांचा रहिवास / वापर तात्काळ थांबविण्यात यावा अन्यथा दुर्देवीरित्या अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील याची नोंद घेण्यात यावी.